गाळ्यांच्या शटर्सची मोडतोड : महानगरपालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : लिलाव होऊन तीन महिने होत आले तरीही गाळ्यांचे काम अपूर्णच
प्रतिनिधी /बेळगाव
नेहरूनगर येथील खुल्या जागेत महापालिकेने व्यापारी संकुलाच्या उभारणीचे काम हाती घेतले आहे. हे काम पूर्ण होण्यापूर्वीच येथील व्यापारी गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविली होती. मात्र, हे काम रखडले असून येथील गाळ्यांचा दुऊपयोग होत आहे. गाळ्यांचे शटर तोडण्यात आले असून महापालिका प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याने मनपाचा निधी वाया गेल्याची टीका शहरवासिय करीत आहेत.
महापालिकेकडून कोट्यावधी निधी खर्च करून नवीन व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात येत आहे. पण व्यापारी संकुलाच्या उभारणीत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. संकुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने लिलाव प्रक्रिया राबविली होती. येथील 45 गाळ्यांना यापूर्वीच बोली लावली आहे. पण हस्तांतर करण्यात आले नाही. काम पूर्ण झाल्यानंतर हस्तांतराची अट लिलाव प्रक्रियेवेळी घातली होती. पण लिलाव होऊन तीन महिने होत आले तरीही गाळे तयार नाहीत.
गैरप्रकाराच्या तक्रारी
गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी महापालिकेने शटर बसविले आहेत. मात्र, सध्या उर्वरित कामे करण्याकडे महापालिका प्रशासनाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे गाळ्यांचा दुऊपयोग होत आहे. गाळ्यांमध्ये रात्रीच्या वेळी गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
काही मद्यपी या ठिकाणी पार्ट्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचप्रमाणे भटकी जनावरे ठाण मांडत आहेत. काहींनी शटरची मोडतोड केली असल्याचे निदर्शनास आले आहे. शटरची चोरीदेखील झाल्याचे दिसून येत आहे.
ही कामे पूर्ण करून बोली लावलेल्या व्यावसायिकांना गाळे हस्तांतर करण्याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तळघरात दुचाकी आणि चार चाकी पार्किंगतळासाठी महापालिकेने लिलाव प्रक्रिया राबविली होती. पार्किंग शुल्क वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या लिलावावेळी 9 लाख 36 हजार बोली लावण्यात आली आहे. अनामत रक्कम भरून ताबा घेण्याची सूचनाही कंत्राटदाराला केली आहे. पण तळघरात जाण्यासाठी रस्ता नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.
संकुलाचे काम अपूर्ण असतानाच लिलाव प्रक्रिया राबवून महसूल मिळविण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. पण येथील परिस्थिती पाहता महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
निधी वाया गेल्याची प्रतिक्रिया
व्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी कोटीचा खर्च केला जात आहे. पण अर्धवट कामामुळे व संकुलाचा दुरुपयोग होत असल्याने हा निधी वाया गेल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत. महापालिका आयुक्तांनी व्यापारी संकुलाची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.