संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : ‘लोकमान्य’ ठाणे शाखेकडून 100 कोटी ठेवी पूर्ण
प्रतिनिधी /मुंबई
माझे आजोबा, आई-वडील सत्याग्रही असल्याने त्यांच्या चळवळीचा वारसा माझ्यापर्यंत झिरपल्याने ‘तरुण भारत’चा प्रसार झाला. त्यावेळी गोवा, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर एकंदरीत राज्यभर तरुण भारत ही चळवळ ठरली. चळवळीचे मुखपत्र असल्याने प्रत्येकाला त्याबद्दल आदर आहे. तरुण भारतला 103 वर्षे पूर्ण झाली असून चळवळीचे हे पुण्य सहकार क्षेत्रातील कामासाठी मिळाले. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे…’ हा जागर बेळगाव येथील तरुण भारतचे कार्यालयात सर्वप्रथम केला. नंतर हा मंत्र देशभर गाजला. टिळकांच्या मंत्रातील स्वराज्याचे सुराज्य करण्याचे काम लोकमान्य संस्थेद्वारे सेवेतून सुरू आहे. यातून जो फायदा मिळवतो, तो समाजालाच पुन्हा देत असल्याचे प्रतिपादन लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांनी केले.
लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीच्या ठाणे येथील शाखेने 100 कोटी ठेवींचा टप्पा गाठल्याने ठेवीदारांचा मेळावा ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे आयोजित केला होता. यावेळी ठाकुर सभासद तसेच ठेवीदारांशी संवाद साधत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संस्थापक-अध्यक्ष किरण ठाकुर, संस्थेचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू, रिजनल मॅनेजर रमेश शिरसाट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
किरण ठाकुर म्हणाले, लोकमान्य संस्था टिळकवाडी येथे सुरू करण्यात आली असून देशातील एक अग्रगण्य सोसायटी आहे. यात ठेवीदारांचा विश्वास महत्त्वाचा आहे. कोरोना काळात लोकमान्यच्या कर्मचाऱयांनी घरोघरी जाऊन वाखाणण्याजोगी सेवा दिली. त्यातूनच लोकमान्यचे कार्यालय आता पुण्याला आणले. पुणेकर चोखंदळ असल्याने ठेवीचा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला. आमचे आजोबा आणि आई-वडिलांनी संयुक्त महाराष्ट्र लढय़ात शिक्षा भोगली असून माझे वडील बाबुराव ठाकुर लोकमान्य टिळकांचे अनुयायी तसेच ते म. गांधींचेही अनुयायी होते.
त्यावेळी महाराष्ट्र-कर्नाटक असा प्रश्न नसल्याने पिताश्री बाबुराव ठाकुर यांनी 180 मराठी शाळा तसेच टीचर्स ट्रेनिंग
कॉलेज काढले. पिताश्री बाबुराव ठाकुर चार वेळा ब्रिटिशांविरोधात लढताना तुरुंगात गेले. आधी तरुण भारत आाणि आता लोकमान्य संस्थेतून समाजकार्य सुरू आहे. सामाजिक बांधिलकीतून रुग्णवाहिका, किंवा तीस-चाळीस हजार पुस्तके असलेली लोकमान्य लायब्ररी 1 कोटी रुपये खर्चातून सुरू केली. तसेच विविध संस्थांना मदत केली असून ही मदतच 50 कोटीहून अधिकच्या घरात जाऊ शकते.
कागल येथील काडसिद्धेश्वर मठातील रुग्णालयाला यंत्रणेकरिता 1 कोटी रुपयांची यंत्रणा तिथे देण्यात आली. आता यंत्रणेचा रुग्णांना फायदा होत आहे. मालवण येथील कॉलेजला 1 कोटी तर मराठा इन्फंट्रीच्या
हॉलसाठी 80 लाखांचा निधी दिला. राज्यातील दुष्काळासाठी आर. आर. पाटील यांच्या काळात 30 लाख तर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ओल्या दुष्काळासाठी 50 लाख दिले. त्याचवेळी कर्नाटक राज्यालादेखील मदत करण्यात आली. कोरोना काळात 75 लाख सरकारला दिले. हे सर्व तुमच्यामुळे झाले असल्याचे सांगत ठाकुर यांनी आभार मानले.
सूत्रसंचालन विघ्नेश जोशी यांनी केले. संचालक पंढरी परब यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आरबीआयचे संचालक सतीश मराठे, लोकमान्यचे सुरक्षा विभागाचे प्रमुख कर्नल गुरुंग, प्रसिद्ध गायिक उत्तरा केळकर तसेच मुंबई दूरदर्शन केंद्राच्या निर्मात्या उमा दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गायिका मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांच्या स्वरबहार गीतांची मैफल आयोजिली होती. यावेळी असंख्य सभासद, ठेवीदारांनी मैफिलीचा लाभ घेतला.
लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी आंतरराज्यीय संस्था
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी ही आता आंतरराज्यीय संस्था आहे. लोकमान्यवर विश्वास ठेवल्याने आतापर्यंत सात हजार कोटींचा पल्ला गाठण्यासाठी थोडाच अवधी उरला आहे. आपली चळवळ या संस्थेच्या माध्यमातून होत असून संस्कृती, आरोग्य, शिक्षण आदी सामाजिक कार्याचा आदर्श संस्थेने भावी पिढीसमोर ठेवला आहे. ठाणे शाखेने 100 कोटींचा पल्ला गाठत असताना अनेक शाखादेखील 100 कोटी ठेवीचा पल्ला गाठण्याच्या उंबरठय़ावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.