डागडुजीच्या कामांना देण्यात आली चालना
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्ह्यातील समस्या व गाऱ्हाणे ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय असते. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून या कार्यालयाची डागडुजी किंवा रंगकाम करण्यात आले नव्हते. मात्र, आता या कार्यालयाच्या अंतर्गत व इतर कामांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यालयावरील कौले बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता या कामांना गती मिळणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. आंदोलने, मोर्चे, धरणे सत्याग्रह असे कार्यक्रम दररोज होत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. आंदोलनकर्त्यांना पाऊस व उन्हातच थांबावे लागते. त्यामुळे आता जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी या सर्व समस्या सोडविण्यासाठी जातीने लक्ष दिले आहे.
सध्या जुन्या इमारतींवरील कौले व डागडुजीचे काम करण्यात येत आहे. याचबरोबर इतर कामांनाही चालना देण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच जुन्या इमारतींचा लूक बदलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, इमारतींची रंगरंगोटीही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता कार्यालयाचे लूक बदलण्यात येत असले तरी अधिवेशन आल्यामुळे हे शहाणपण तर सुचले नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या महिन्यात अधिवेशन होणार असल्याने अनेक अधिकारी कामाला लागले आहेत. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाचा कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.