ट्रकचालकांमध्ये भीतीचे वातावरण, बंदोबस्ताची मागणी
वार्ताहर /अगसगे
एपीएमसी मार्केट यार्डमध्ये दिवसेंदिवस चोऱयांचे प्रमाण वाढत आहे. असाच प्रकार पुन्हा घडला आहे. रविवारी रात्री एपीएमसी आवारात थांबवलेल्या सात ट्रकांमधील डिझेल चोरी केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. यामुळे ट्रकचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे एपीएमसी पोलिसांचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळेच चोऱयांना ऊत आला असल्याचा आरोप व्यापारी, शेतकरी, ट्रकचालकांतून होत आहे.
एपीएमसी मार्केट यार्डमध्ये कांदा-बटाटा, कडधान्ये, भाजीपाला, गूळ, रासायनिक खते, तसेच एअर हाऊसमध्ये सरकारी दारूसाठा, साबण, तांदूळ, गहू आदी साहित्य ने-आण करण्यासाठी राज्यासह इतर राज्यांमधून दररोज शेकडो ट्रकची ये-जा असते. रात्री उशीर झाल्यास एपीएमसी आवारातच ट्रक थांबविल्या जातात. याचाच फायदा काही अज्ञात चोरांनी घेतला आहे. रविवारी रात्री ट्रक थांबवून चालक व वाहक ट्रकमध्ये झोपले असतानाच सात ट्रकांमधील डिझेल चोरी करून नेल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी ट्रक चालू होत नसल्यामुळे चालकांनी एकमेकांच्या वाहनांच्या डिझेलच्या टाक्मया तपासल्या. त्यावेळी डिझेलची चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
भीतीचे वातावरण
मार्केट यार्डमध्ये दिवसेंदिवस चोरीचे प्रकार घडत आहेत. रात्रीच्यावेळी कांदे-बटाटे चोरणे, भाजीपाल्याच्या गाठी चोरणे, झोपेत असलेल्या हमालांच्या खिशामधील पैसे, मोबाईल चोरणे या घटना तर घडतच असतात.
आंदोलकांचीही रक्कम लंपास
एक महिन्यापूर्वी भाजी व्यापारी, शेतकरी आणि भारतीय कृषक समाजाच्यावतीने खासगी भाजी मार्केट विरोधात आंदोलन सुरू असताना रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त असताना देखील आंदोलक रात्री झोपेत असताना आंदोलकांच्या खिशातील रोख रक्कम, किमती मोबाईलची चोरी केली होती. यामुळे सध्या मार्केट यार्डमध्ये चोऱयांना ऊत आला आहे. परिणामी रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने व्यापारी, हमाल, खरेदीदार, शेतकरी, ट्रकचालक, वाहक भयभीत झाले आहेत.
गुन्हेगारी टोळी सक्रिय
एपीएमसीचा विस्तार सुमारे 83 एकर आहे. या ठिकाणी रात्री अकरा, बारानंतर गुन्हेगारी प्रवृत्ती जागी होते. निर्जन ठिकाणी गांजा ओढणे, जुगार खेळणे, दारू पिणे तसेच लुटमारीचे प्रकार वारंवार घडत असतात. यातच ठिकठिकाणी पथदीप बंद पडले आहेत. या अंधाराचा फायदा गुन्हेगारी टोळी घेत आहे. गेल्या काही वर्षांपासून ही टोळी मार्केट यार्ड आवारात चोरी-लुटमारीचे प्रकार करत असल्याची शंका व्यापारी, शेतकऱयांतून व्यक्त होत आहे.
एपीएमसी पोलिसांना अपयश
गेल्या वीस वर्षांपासून एपीएमसी आवारात चोरी, लुटमार, खुनांचे प्रकार घडत असले तरी अद्याप एपीएमसी पोलिसांना गुन्हेगारांना पकडण्यात अपयशच येत आहे. इ. स. 2002 साली एपीएमसी प्रवेशद्वारापासून हाकेवरच्या अंतरावरील एका दुकानामध्ये झोपलेल्या मण्णिकेरीच्या हमालाची निर्घृण हत्या करून दुकानामधील एक लाखाहून अधिक रक्कम लांबविण्यात आली होती. या घटनेचा अद्याप उलगडा झालेला नाही. असे असताना येथे आता टोळके सक्रिय झाले आहे. यामुळे दररोज रात्रीच्या वेळी लुटमार, चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी एपीएमसी पोलिसांनी रात्रीच्यावेळी एपीएमसी आवारात गस्त ठेवावी, अशी मागणी व्यापारी, शेतकरी, खरेदीदार व ट्रकचालकांतून होत आहे. पोलिसांनी गुन्हेगारांचा तपास लावून बंदोबस्त करावा, अशीही मागणी होत आहे.