कांपाल येथे साकारणार 9 कोटींचा प्रकल्प : सरकारी भंगाराची विल्हेवाट लावण्याचा हेतू
प्रतिनिधी /पणजी
’कचऱयातून कलाकृती’ या संकल्पनेवर आधारित थीम पार्क लवकरच पणजीत साकारणार असून सुमारे 9 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचे डिझाईन, अभियांत्रिकी आणि विकासासाठी निविदा जारी केली आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उभारण्यात येणाऱया या थीम पार्कचे वैशिष्टय़ म्हणजे येथील बहुतेक शोकेसिंग शिल्पे, कलाकृती, या विविध सरकारी खात्यांमध्ये पडून असलेल्या भंगार साहित्यापासून तयार करण्यात येणार आहेत. या पार्कच्या निर्मितीसाठी अंदाजे 200 किलो भंगाराचा वापर केला जाईल.
हा प्रस्तावित थीम पार्क कांपाल येथील भगवान महावीर उद्यानाला जोडूनच उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाची नोडल संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार महामंडळाकडून प्रत्येक सरकारी खाती, स्वायत्त संस्था आणि राज्य चालवल्या जाणाऱया अन्य संस्थांमध्ये पडून असलेले ई-कचरा वगळता वाहने तसेच अन्य सर्व भंगार साहित्य, विनावापर उपकरणे, यांची माहिती गोळा करणार आहे.
कचरामुक्त राज्य बनण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या थीम पार्कची योजना आखण्यात आली आहे. त्याच माध्यमातून शाश्वत विकास आणि अखंडित अर्थव्यवस्थेबद्दल सामान्य लोकांमध्ये सामाजिक संदेश पोहोचविण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले आहे. असे भंगार वा कचऱयामधून वापरण्यायोग्य साहित्य निवड करून वेस्ट-टू-आर्ट पार्क शोकेसिंग शिल्पे विकसित करण्यासाठी वापरण्याचा मानस महामंडळातील सुत्रांनी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पासह केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या मुल्यांकनानुसार स्वच्छ सर्वेक्षणात चांगले गुण मिळवण्याचेही महामंडळाचे ध्येय आहे. आतापर्यंत ’वेस्ट टू वंडर’ पार्क विकसित करण्यात योगदान दिलेल्या शहरांसाठी या सर्वेक्षणात विशेष गुणांकन देण्यात आले आहे.