के. कविता यांचे राहुल गांधी यांना आव्हान
बीआरएस आमदार के. कविता यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी काँग्रेसशासित कुठल्याही राज्यात तेलंगणाच्या तुलनेत एक अतिरिक्त नोकरी देण्यात आल्याचे सिद्ध करून दाखविल्यास मी राजकारण सोडून देईन असे आव्हान कविता यांनी दिले आहे. तेलंगणा काँग्रेस नेते भट्टी विक्रमार्का यांच्याकडून एका मंदिरात प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करणे आणि तेलंगणात 6 गॅरंटी लागू करण्याची शपथ घेतल्याप्रकरणी त्यांनी टीका केली आहे. सर्वात जुना पक्ष अत्यंत चुकीची आणि पोकळ आश्वासने देत असल्याचे कविता यांनी म्हटले आहे. कुठल्याही काँग्रेसशासित राज्यात जर तेलंगणा सरकारकडुन देण्यात आलेल्या नोकऱ्यांपेक्षा एक नोकरी अधिक दिली असल्यास मी वैयक्तिक स्वरुपात राजकारणातून बाहेर पडेन. परंतु राहुल गांधी यांना हे सिद्ध करून दाखविता न आल्यास त्यांनी राजकारण सोडावे. राहुल गांधी यांनी तेलंगणाच्या युवांना खोटी आश्वासने देऊ नयेत. लोकांचा विश्वासघात करू नये अशा शब्दात कविता यांनी काँग्रेसला सुनावले आहे.
कर्नाटकात आश्वासनांची पूर्तता नाही
काँग्रेसने कर्नाटकात 5 आश्वासने दिली होती, यातील काही आश्वासनांचा काँग्रेसला विसर पडला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने 100 दिवसांच्या आत 2.60 लाख नोकऱ्यांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची गॅरंटी दिली होती. परंतु आजवर तेथे काहीच सुरू झालेले नाही असा आरोप कविता यांनी केला आहे.