आहार पुरविणाऱ्या स्वयंसेवा गटांचा इशारा : शिक्षण खात्याला रविवारपर्यंतची दिली मुदत
विशेष प्रतिनिधी /पणजी
माध्यान्ह आहार योजनेसाठी शिक्षण खात्याकडे निधी नसल्याने गेले आठ महिने राज्यातील स्वयंसेवा गटांना त्यांनी केलेल्या खर्चाची बिले फेडलेली नाहीत. राज्यातील स्वयंसेवा गटातील सदस्य प्रचंड नाराज झालेले आहेत. निधीअभावी विद्यार्थ्यांशी असे व्रुर का वागता? असा सवाल गटातील महिलांनी केला आहे. रविवारपर्यंत पैसे दिले नाहीत तर नाईलाजाने सेवा बंद करू, असा इशारा महिला गटांनी शिक्षण खात्याला दिला आहे.
या संदर्भात महिलांनी दिलेल्या माहितीनुसार शालेय शैक्षणिक वर्ष जूनच्या 5 तारखेला सुरू झाले. दि. 20 जूनपासून विद्यार्थीवर्गाला माध्यान्ह आहार पुरविण्याचे काम राज्यातील स्वयंसेवा गटांतील महिलांनी सुरू केले. राज्यातील एकूण 108 गटांनी मुलांना माध्यान्ह आहार देण्यास प्रारंभ केला.
मुलांसाठी महिला गट घेतात कष्ट
प्रत्येक मुलामागे रु. 6 असा दर होता. वास्तविक 6 रुपयांमध्ये काहीही येत नाही. तरीदेखील हजारो मुले असल्याने त्यातल्या त्यात या महिला माध्यान्ह आहार शिजवतात व शाळांमध्ये नेऊन पोहोचवितात. अलिकडे सप्टेंबरमध्ये सरकारने 8 रुपये व रु. 10 असे दोन दर प्रती विद्यार्थ्यामागे निश्चित केले आहेत. राज्यातील महिलांचे हे स्वयंसेवा गट मुलांना विनाखंड आहार पोहोचवितात. त्यासाठी पहाटे साडेतीन वाजल्यापासून महिला काम करीत असतात.
शिक्षण संचालक झाले हतबल
दुर्दैवाने गेल्या आठ महिन्यांमध्ये सरकारने या महिलांची बिले फेडलेली नाहीत. महिला गटांचे सदस्य वारंवार शिक्षणखात्यात खेपा मारीत आहेत. शिक्षण संचालक झिंगडे हतबल झालेले आहेत. त्यांनी महिलांना थोडे दिवस थांबा, पैसे देऊ. निधी आल्यानंतर लागलीच पैसे फेडले जातील. आम्ही कोणाचीही बिले ठेवणार नाही, अशी आश्वासने दिली. मात्र गेले कित्येक महिने ही आश्वासने महिला गटांना पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतात.
दागिने गहाण ठेवून दिली सेवा
आता आमची सारी सहनशक्ती संपली. एका स्वयंपाक गॅस सिलिंडरचा दर रु. 1800 (व्यावसायिक) झाला आहे. तो सिलिंडर दोन दिवसांत वापरून संपतो. खाद्यपदार्थ तयार करून देण्यासाठी कच्चा माल लागतो. उधारीवर आता कोणीही देण्यास तयार नाही. अशा वेळी कित्येक महिलांनी आपले दागिने गहाण ठेवून कर्जे काढली आणि मुलांना माध्यान्ह आहार देण्यासाठी विनाखंड सेवा बजावली.
मागील वर्षांचीही बिले थकीत
काही गटांनी जोरदार आवाज उठवल्यानंतर त्यांना तीन महिन्यांची बिले सप्टेंबरमध्ये देण्यात आली. परंतु बहुसंख्य गटांची बिले फेडलेली नाहीत. तत्पूर्वी मागील शैक्षणिक वर्षातील 55 दिवसांच्या बिलांची रक्कम अद्याप शिक्षण खात्याने फेडलेली नाहीत.
बिले मिळत नसल्याने महिला संतप्त बनल्या आहेत. त्यांनी गेले चार दिवस शिक्षण खात्याची दारे ठोठावलेली आहेत. शिक्षण संचालकांनी आश्वासने दिली. मात्र त्याने समाधान झाले नसल्याने महिलांनी आता सरकारला चांगला इंगा दाखविण्यास प्रारंभ केला आहे. येत्या रविवारपर्यंत स्वयंसेवा गटांचे पैसे फेडले नाहीत तर सोमवारपासून नाईलाजाने माध्यान्ह आहार बंद करावा लागेल, असा इशारा दिला आहे. शिक्षण खात्यातील एका अधिकाऱ्याने तसे लेखी द्या, असा आग्रह धरल्याने या महिला आणखी संतापल्या आहेत.
मुख्यमंत्री दखल घेतील?
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार देणाऱ्या महिला गरीब आहेत. त्यांनी सरकारकडे मदत मागितली नाही. किमान त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना मिळावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री याची दखल घेतील का? असा संतप्त सवाल महिलांनी केला आहे. एवढी सेवा बजावल्यानंतर शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री लक्ष घालीत नसल्याबद्दल महिलावर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.