पुणे / प्रतिनिधी :
एकरकमी एफआरपीचा निर्णय बदलण्याचे धाडस शिंदे-फडणवीस सरकारने दाखवावे. या मुद्दय़ावर वेळीच कणखरपणा दाखवला नाही, तर सरकारला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सोमवारी येथे दिला. संघटनेच्या मागण्यांवर सरकार कसा प्रतिसाद देते, यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. मात्र, एकरकमी एफआरपी देण्यास सरकारला भाग पाडूच, असा निर्धारही शेट्टी यांनी या वेळी व्यक्त केला.
ऊस उत्पादक शेतकऱयांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका टॉकीज चौकापासून साखर संकुलावर धडक मोर्चा काढण्यात आला. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या मोर्चात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, पुण्यासह राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, साखर संकुलात जाऊन शेट्टी यांनी या वेळी साखर आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले.
सभेत बोलताना शेट्टी म्हणाले, आतापर्यंत एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने दोन टप्प्यात शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. शिंदे-फडणवीस सरकारने मागील सरकारच्या काळातील सर्व निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. आता त्यांनी हा निर्णयही रद्द करावा व शेतकरी हिताची भूमिका घेण्याचे धाडस दाखवावे. आमची हीच मागणी आहे. मात्र, सरकार दुटप्पीपणाने वागत आहे. 15 ऑक्टोबर रोजी ऊस परिषद घेऊन स्वाभिमानीने राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. मागील वर्षभरात साखरेला चांगला भाव मिळालेला आहे. साखरेशिवाय इथेनॉल वाढविण्यास प्राधान्य देऊन त्यासही प्रोत्साहनात्मक चांगला भाव दिला गेला असून, तो कारखान्यांना मिळाला आहे. त्यामुळे साखरेच्या 3100 रुपये प्रति क्विंटल भावास 200 रुपये अधिकचे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी आहे. साखर उद्योगाला चांगले दिवस असल्याने आम्ही एफआरपीपेक्षा वाढीव पैसे मागत आहोत. परंतु त्याकडे सरकार, साखर कारखाने गांभीर्याने पाहण्यास तयार नाही, अशी टीका त्यांनी केली.