ऑनलाईन टीम/तरुण भारत
नागपूरला होणारा C-295 लष्करी विमान वाहतुकीचा प्रकल्प आता वडोदऱ्याला होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २२ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे.
सचिन सावंत यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की “फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) पाच वर्षांच्या कालावधीनंतर शिंदे-फडणवीस हे दुसरं सरकार आहे, गुजरातच्या (Gujarat) हितासाठी मोदी सरकारच्या (Modi Government) आज्ञेनुसार अतिशय समर्पित होऊन काम करत आहे. गुजरात सुजलाम, सुफलाम व्हावा यासाठी देशात सध्या तीन सरकार कार्यरत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
याशिवाय “मोदी सरकारची मागील आठ वर्षांपासूनची इच्छा पूर्णपणे स्पष्ट आहे की, देशातील सगळे प्रकल्प हे गुजरातमध्येच जावेत. परंतु महाराष्ट्राचं अहित होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते हे शब्द उच्चारण्याची हिंमत करत नाहीत. यापेक्षा दुर्दैवाची बाब कुठली असणार नाही. महाराष्ट्राच्या अहिताच्या पापाचे वाटेकरी ते आहेत.” असा सचिन सावंत यांनी आरोप केली आहे.
एक मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार, दुसरं गुजरातचं सरकार, तिसरं महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार. त्यामुळे ज्या वेगाने महाराष्ट्रातील काही प्रकल्प काही महिन्यांमध्ये गुजरातकडे चालले आहेत, तो वेग पाहता जितका काळ हे सरकार राहील, तेवढ्या कालावधीत महाराष्ट्र कंगाल झाल्याशिवाय राहणार नाही, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.” असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हंटले आहे.