पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील पावसाचा जोर ओसरला असला, तरी पुढील आठवड्यात मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात हवामान विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, कोकण-गोव्यात उष्णतेची लाट पसरली असून, रविवारपर्यंत ती कायम राहणार आहे.
अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात पुन्हा कमाल तापमान वाढू लागले आहे. कोकण-गोव्यात उष्णतेची लाट आहे. या भागात कमाल तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. या परिसरात रविवारपर्यंत ही लाट कायम असेल. तसेच राज्यात पुढील दोन दिवस कमाल तापमान कायम राहणार असून, त्यानंतर ते खाली येण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे सोमवारी तसेच मंगळवारी मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ात वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेती उद्धवस्त झालेली असतानातच पुन्हा पावसाच्या इशाऱ्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे.
काजू, आंब्याबाबत काळजी घ्यावी
दरम्यान, कोकण गोव्यातील उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन कृषी हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. काजू, केळी यांसारख्या फळपिकांना पाणी द्यावे, कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नारळ, सुपारी आणि आंब्याच्या नवीन लागवड केलेल्या रोपांसाठी सावली करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात काही पिकांची काढणी करावी
मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता गृहीत धरून ऊस, ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांची लवकरात लवकर काढणी करावी आणि काढणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. द्राक्ष पिकण्याच्या ते काढण्याच्या अवस्थेपर्यंत द्राक्ष बागेस गरजेनुसार पाणी द्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
राज्याच्या काही भागांत नोंदविण्यात आलेले कमाल तापमान पुढीलप्रमाणे : सिंधुदुर्ग 36, रत्नागिरी 37, ठाणे 38, नगर 35, कोल्हापूर पुणे, नाशिक, जळगाव 34, सोलापूर, धुळे 36, नंदूरबार, सातारा, सांगली 35, संभाजीनगर 33.