अध्याय एकविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, स्वर्ग इत्यादी लोक स्वप्नासारखे नाशवंत आहेत परंतु त्यांची वर्णने कानाला गोड वाटतात. त्यामुळे तेथील भोगांची आशा मनात बाळगून त्यासाठी माणसे आपल्याजवळील धन खर्च करून टाकतात. स्वप्न दिसते आणि लागलीच नाहीसे होते, त्याप्रमाणे ह्या जगाची अवस्था आहे. ज्याप्रमाणे जग मिथ्या आहे त्याप्रमाणे स्वर्गही मिथ्या आहे पण कामनेने वेडावलेल्या सकाम पुरुषांचा स्वर्ग सत्य आहे यावरच विश्वास असतो.
म्हणून सकाम लोक स्वर्गासाठी हट्ट घेऊन बसतात. एखादा रस्ता पिंपळावरून जातो असे कोणी म्हंटले तर त्याचा शब्दशः अर्थ घेऊन, जर एखादा त्या वृक्षावर चढू लागला तर, तो जसा भ्रमाने गुंतून राहतो, त्याप्रमाणे स्वर्गाचे वैभव ऐकून सकामाची दशा होते. मनुष्याने स्वधर्माच्या मार्गाने चालावे म्हणून वेद स्वर्गाचे एक अवांतर फळ दाखवितो (मुख्य फळ नव्हे) पण सकाम लोक भ्रमिष्ट होऊन स्वर्गाच्याच पाठीला लागतात! ‘पिंपळावरून वाट आहे’ हे ऐकून शहाणा असतो तो त्या मार्गाकडे लक्ष ठेवून चालू लागतो व पिंपळाला वळसा घालून आनंदाने आपल्या ठिकाणी पोहचतो. त्याप्रमाणे स्वधर्माच्या अनु÷ानात जो स्वर्गाची फळे उपेक्षून टाकून देतो, त्याचे चित्त शुद्ध होऊन तो स्वतः ब्रह्मसमाधान पावतो. ह्या स्वधर्ममार्गाला सोडून, कानाला गोड वाटणाऱया स्वर्गसुखाला सकाम लोक भुलतात. घंटानादाला मृग भुलून पडतात, त्याप्रमाणे कर्मभूमीत जन्माला येऊन धनधान्यसमृद्धी खर्च करून स्वर्गसुखाला भाळून, अनायासे लाभलेल्या नरदेहाला फुकटचे मुकतात! ज्याप्रमाणे कोणी एखादा वाणी जुने मोडके तोडके गलबत घेऊन, इतर देशी व्यापारासाठी गेले असता मोठा नफा होतो असे ऐकून, फारसा विचार न करिता समुद्रात शिरतो आणि बुडतो, तीच गत सकामांची होते! बिचारे स्वर्गाची इच्छा धरून संसारसागरामध्ये बुडून जातात! स्वर्गसुखाची इच्छा केली, की स्वधर्मरूपी सारे द्रव्य बुडते, चित्तशुद्धीचे मूळच नाहीसे होऊन नरदेहरूपी मुद्दल नष्ट होते!
सत्व, रज, तम ह्या त्रिगुणांमुळे माणसामध्ये सकाम कर्म करण्याची प्रवृत्ती असते. रज व तम अत्यंत वाढले की, रजाच्या संगतीने काम चित्ताला व्यापून खवळतो. चित्तामध्ये काम खवळला म्हणजे गुणानुसार विषयावर प्रेम जडते. तेव्हा निश्चितपणे भक्तिपूर्वक तो सकामाचीच संगत धरतो. खरोखर सकामाच्या संगतीमुळे काम्यकर्मामध्येच अत्यंत आदर वाटू लागतो आणि स्वर्गभोगामध्ये तत्पर होऊन देव, पितर, भूत, प्रमथगण यांचे यजन करतो.
ह्याप्रमाणे वासनालुब्ध असणारे लोक, मी सर्वात्मा, सर्वेश्वर, जवळ असताना माझा अनादर करून इतर देवांचीच उपासना करतात. आता कदाचित तू म्हणशील, इतर देव जरी झाले तरी सर्व काही तूच आहेस पण असा ऐक्मयभावही त्यांचा असत नाही. म्हणून इतर देव व मी वेगवेगळे आहोत असे ते समजतात. त्यामुळे त्यांना वाटतं की, माझी पूजा करून त्यांना अपेक्षित फळ मिळणार नाही म्हणून माझी पूजा करायचे सोडून इतरांच्या पूजेत मग्न होतात. अरे! इंद्रादि देवांच्या द्वाराने मीच प्रसन्न होतो हे खरे पण त्यांचे सकाम मन स्वर्गाचीच इच्छा धरत असल्यामुळे ते माझे भजन करीत नाहीत. मनामध्ये दृढ वासना बिंबलेली असते, यामुळे स्वर्गाला पुनरावृत्तीचे फेरे आहेत असे जरी त्यांना सांगितले, तरी तो त्यांना हितकरच वाटतो. ते अशी कल्पना करतात की, “आम्ही या लोकी यज्ञांचेद्वारा देवतांचे यजन करून स्वर्गांमध्ये जाऊ आणि तेथे दिव्य पदार्थांचा उपभोग घेऊ. त्यानंतर जेव्हा पुन्हा आम्हांला जन्म मिळेल, त्यावेळी आम्ही मोठय़ा कुलीन श्रीमंत परिवारात जन्म घेऊ. खरं सांगायचं झालं तर, जे पृथ्वीतलावर मनुष्यरूपाने जन्माला येतात, ते सहजच मोक्षाचे अधिकारी असतात पण इच्छापूर्तीसाठी आणि स्वर्गासाठी इतर देवतांचेच भजन करतात! स्वर्गभोगावरच मन ठेवून अनेक यज्ञयाग करतात आणि तेवढय़ाने आपल्याला स्वर्गातील सुखोपभोग मिळतील अशी त्यांना खात्री वाटत असते.
क्रमशः