सातारा : समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच पद्धतीचे काम माध्यमांनी करावे असे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Minister Chandrakant Patil) यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावात आयोजित डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र पहिले राज्यस्तरीय अधिवेशन 2022 च्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख, डिजीटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने, संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास भोसले आदी उपस्थित होते.
पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात कडक कायदे होण्यासाठी आम्ही आग्रही असल्याचे सांगून पाटील म्हणाले. निर्भीड पत्रकारितेसाठी ते गरजेचे आहे. पत्रकारितेतील सुरुवातीच्या काळासाठी त्यांना काही विद्यावेतन देता येईल का ? याचाही अभ्यास करु. पत्रकारांना आरोग्य, मुलांना शिक्षण तसेच राहण्यासाठी घरे याबरोबर जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा : डिजीटल पत्रकारितेचे सामर्थ्य विधायक परिवर्तनासाठी वापरणे गरजेचे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश
स्पर्धात्मक युगात डिजीटल मीडियाने विश्वासहार्ता निर्माण करणे गरजेचे
कोणत्याही प्रकारची बातमी लोकांपर्यंत क्षणार्धात पोहचविण्याचे काम डिजीटल मीडिया करीत आहे. डिजीटल मीडियाशी शहरी तसेच ग्रामीण भागातील लोक जोडलेली आहेत. तरी या माहिती पोहचविण्याच्या स्पर्धात्मक युगात डिजीटल मीडियानी आपली विश्वासहार्ता निर्माण करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अधिवेशनास दिलेल्या शुभेच्छा संदेशात केले.
मुख्यमंत्री शिंदे संदेशात पुढे म्हणाले, पुस्तक व डिजीटल अशी दोन्ही माध्यम आज अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. कोरोना संकटाच्या काळात डिजीटल मीडियाने चांगली कामगिरी करुन नागरिकांना जागृत करण्यासोबतच धीर देण्याचे मोठे काम केले आहे. विविध सुविधांसाठी संघटनेने एक आदर्श नियमावली व आचार संहिता तयार करावी. सत्यता, सभ्यता व लोकाभिमुखता या त्रिसुत्रीच्या माध्यमातून मीडियाचा विस्तार करावा. लोकांपर्यंत क्षणार्धात माहिती पोहचविण्याचे हे साधन आहे. या क्षेत्रातील संपादक पत्रकारांच्या समस्या या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत नक्की पोहचतील. डिजीटल मीडियातील बांधवांसाठी सकारात्मक निर्णय घेण्याचा निश्चित पणे प्रयत्न करु, असेही ते यावेळी संदेशात म्हणाले.