अजित डोवाल यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अग्नीपथ ही योजना सेनादले आणि सेनादलांमध्ये जाऊ इच्छिणारे युवक, यांच्यासाठी अतिशय लाभदायक असून ती मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केली आहे. त्यांनी अग्नीवीरांसंबंधी उपस्थित केल्या जाणाऱया इतर कुशंकाही फेटाळल्या आहेत.
गेल्या आठवडय़ात अग्नीपथ योजनेला विरोध करण्यासाठी अनेकांनी हिंसक आंदोलन केले होते. या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची मोठय़ा प्रमाणात हानी झाली होती. काही रेल्वेगाडय़ांना आग लावण्यात आली होती. या पार्श्वभूमीवरही डोवाल यांनी महत्वाचे प्रतिपादन केले आहे. ज्यांना निदर्शने करायची आहेत, त्यांनी ती शांततेने करावीत. या निदर्शनांच्या पाठीशी काही समाजविरोधी शक्ती आहेत, असे पुरावे उपलब्ध आहेत. सरकार योग्य ती कारवाई करणार आहे. मात्र, ज्यांना सेनेत यायचे आहे, त्यांनी निःशंक मनाने तयारी करावी. त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे कळकळीचे आवाहनही डोवाल यांनी केले.
देश आणि नेतृत्वावर विश्वास ठेवा
एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची मते व्यक्त केली. युवकांनी देश आणि देशाचे नेतृत्व यावर विश्वास ठेवावा. दिशाभूल करणाऱयांना जवळ करु नये. हिंसाचार करणे निषेधार्ह आहे. सरकारने चर्चेची तयारी दर्शविली आहे. युवकांनी अशा मार्गाचा अवलंब करु नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अग्नीवीरांच्या निष्ठेसंबंधी शंका नको
चार वर्षांनंतर जे अग्नीवीर निवृत्त होतील, त्यांचा उपयोग भाडोत्री सैनिक म्हणून समाजविघातक शक्तींकडून केला जाईल, अशी शंका काहीजण व्यक्त करीत आहेत. मात्र, या शंका अनाठायी आहेत. उलट सैन्यामध्ये होणारे देशभक्तीचे संस्कार अग्नीवीरांना उत्कृष्ट नागरीक बनविण्यास साहाय्यभूत ठरतील. त्यामुळे सर्व आरोप चुकीचे आहेत, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी केली.