प्रहार अपंगक्रांती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : दिव्यांगांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सादर
प्रतिनिधी/कोल्हापूर
दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय करावे, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी प्रहार अपंगक्रांती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांच्या नेतृत्वाखालील दिव्यांग बांधवांनी हे आंदोलन केले. ‘दिव्यांगांचे स्वतंत्र मंत्रालय झालेच पाहीजे’ असे फलक अनेकांच्या हातात झळकत होते. या ठिकाणी घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांची भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवावयाचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, राज्यात दिव्यांगांची संख्या सुमारे 50 लाख रुपये इतकी आहे. यातील अनेक दिव्यांग आजतागायत वंचित आहेत. त्यांच्या उन्नती व सर्वांगिण विकासासाठी मागासवर्गीय, महिला, अल्पसंख्यांक व क्रीडा मंत्रालयाप्रमाणे दिव्यांगांचे स्वतंत्र मंत्रालय व्हावे, यासाठी आमदार बच्चू कडू सातत्याने करत आहेत. या मागणीला पाठींबा म्हणून कोल्हापूर जिह्यातील दिव्यांगांतर्फे स्वाक्षरी मोहिम घेऊन याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून पाठविले आहे. अशा प्रकारची मोहिम गुरुवारी व आज, शुक्रवारपर्यंत राज्यभर सुरु राहणार आहे. याची दखल सरकारने घेतली नाही तर मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
या आंदोलनात अनिल मिरजे, विकास चौगुले, विष्णूपंत पाटील, युनूस शेख, वैजनाथ केसरकर, सुरेश ढेरे, सुनील पाटील, रावसाहेब मिठारी, योगेश गुरव, रोहन नरके, जयश्री शिंदे, जानकी मोकाशी, रंजना गुलाईकर, उज्वला चव्हाण, आस्मा स्वार, अजित जाधव आदी सहभागी झाले होते.