हिंमत असेल तर अडवून दाखवा : मनोज परब यांचा इशारा : म्हादई रक्षण पदयात्रेत अडथळा निर्माण करणे खेदजनक प्रकार
वाळपई : यासाठी आर.जी पक्षाने टुगेदर फार म्हादई या नावाखाली सत्तरी तालुक्यात पदयात्रा सुरू केली. मात्र म्हाऊस पंचायतीने यासाठी हरकत घेतली. यावर उपजिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी 21 रोजी दुपारी 3 वा. सुनावणी घेण्यात आली. या संदर्भात आर.जी पक्षातर्फे वकिलांनी जोरदार युक्तिवाद उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर केला. मात्र या संदर्भाचा निकाल देण्यात आलेला नाही. दरम्यान, निकाल कोणताही असो मात्र सत्तरी तालुक्यातून शंभर किलोमीटरची पदयात्रा कोणत्याही परिस्थितीत होणारच. हिम्मत असेल तर अडवून दाखवा अशा आव्हान या पक्षाचे मनोज परब यांनी दिले आहे. युक्तिवाद संपल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आक्रमक स्वरूपात भूमिका मांडली. सत्तरी तालुक्यातील दोन्ही मतदारसंघातून मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दहा हजार मते या पक्षाला मिळालेली आहेत. यामुळे राजकीय दृष्ट्या या पक्षाच्या पदयात्रेला आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी होणारच नाही अशा प्रकारचे निवेदन मनोज परब यांनी केले आहे. यावेळी त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे व पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांच्यावरह जोरदार टीका केली. पदयात्रेला सरकारच्या यंत्रणेचा वापर करून अडविणे हे खरोखरच खेदाची बाब आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला अभिप्राय व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असते. सत्तरी तालुक्यातून पदयात्रेला सुऊवात झाली. पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रs नव्हती. नदीच्या अस्तित्वासाठी व तिच्या संरक्षणासाठी जनजागृतीच्या माध्यमातून ही पदयात्रा निश्चित करण्यात आली होती. मात्र या भागामध्ये या पक्षाची वाढ होणार या भीतीने सरकारी यंत्रणेला हाताशी धरून हा राजकीय खेळ खेळण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी मनोज परब यांनी केला.
अन्यथा न्यायालयात दाद मागू !
निकाल जर पक्षाच्या विरोधात गेला तर या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात येईल. यामुळे संबंधित अधिकारीसुद्धा गोत्यात येऊ शकतात, असे ते यावेळी म्हणाले. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून लोकशाही तत्त्वांची पायमल्ली करण्याचा प्रयत्न हा पूर्णपणे लोकशाहीच्या विरोधी असल्याचे भाष्य यावेळी त्यांनी केले. कुणाच्या तरी सांगण्यावरून सरपंचांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेले आहे. सर्व निवेदनांचा मचकूर सारखाच असून ते पूर्णपणे हास्यास्पद आहे. यामुळे कोणता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार, असा सवाल यावेळी त्यांनी केला. या पदयात्रेला निवेदनाद्वारे विरोध करणाऱ्या सर्व सरपंचांना बेकायदा कृत्यावरून घेरण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला