राजीव गांधी कला मंदिरच्या नाटय़स्पर्धाच्या बक्षिस वितरण : सातवी महिला संगीत नाटय़स्पर्धा, दुसरी राज्यस्तरिय ऐतिहासिक नाटय़ स्पर्धाचे बक्षिस वितरण
प्रतिनिधी /फोंडा
राजीव गांधी कला मंदिरतर्फे घेतलेल्या नाटय़स्पर्धा राज्यातील एकमेकाद्वितीय आहेत. राज्यस्तरिय ऐतिहासिक नाटय़स्पर्धा व महिला संगीत नाटय़स्पर्धा नाटय़प्रेमी श्रोत्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसाद व प्रेमामुळेच यशस्वी ठरल्या. यंदाही या स्पर्धात खंड पडणार नसून बक्षिसांच्या रक्कमेतही वाढ करण्यात येईल. बालकलकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पौराणिक नाटय़स्पर्धेचे आयोजन भविष्यात करण्यात येणार असल्याची घोषणा कला व संस्कृती तसेच राजीव कला मंदिरचे अध्यक्ष गोविंद गावडे यांनी यावेळी केली.
फोंडा येथील राजीव कला मंदिरतर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरिय महिला संगीत नाटय़ स्पर्धा व ऐतिहासिक नाटय़ स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळयात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कला मंदिरचे उपाध्यक्ष शांताराम कोलवेकर, सदस्य सचिव स्वाती दळवी उपस्थित होते.
ऐतिहासिक नाटय़ स्पर्धेत युद्ध नको मज बुद्ध हवा ची बाजी
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमूळे राजीव कला मंदिरच्या स्पर्धाचे बक्षिस वितरण होऊ शकले नव्हते. 9 नोव्हे 2021 ते 11 डिसें. 2021 दरम्यान घेतलेल्या स्व. रविंद्र लक्ष्मण नाईक स्मृती प्रित्यर्थ दुसरी राज्यस्तरिय ऐतिहासिक नाटय़स्पर्धेत एकूण 20 नाटकांचे सादरीकरण झाले होते. त्यात हळर्ण येथील ओम कला सांस्कृतिक केंद्राच्या ‘युद्ध नको मज बुद्ध हवा’ नाटय़प्रयोगाला रू. 50 हजारांचे रोख पारितोषिक प्राप्त झाले होते.
महिला संगीत नाटय़स्पर्धेत स्वर सत्तरीची सलग चौथ्यांदा विजयी
तर 30 डिसेंबर 2021 ते 11 जाने 2022 दरम्यान घेतलेल्या स्व. किशोरीताई हळदणकर स्मृती प्रित्यर्थ सातवी राज्यस्तरिय महिला संगीत नाटयस्पर्धेत एकूण 12 नाटकांचे सादरीकरण झाले होते. त्यात स्वर सत्तरी होंडातर्फे ‘रणदुंदुभी’ ने बाजी मारली होती. आज महिला संगीत नाटकातून स्त्री व पुरूष दोन्ही पात्रे व्यवस्थितरित्या सांभाळून ही स्पर्धा पुढे नेत आहे हेच स्पर्धेचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. पहिल्या वर्षी सात संस्थानी सहभागी दर्शविला होता. त्यात सातत्याने वाढ होत असून सातव्या आवृत्तीत 12 संस्थानी सहभाग दर्शविला होता.
32 नाटकांसह 950 कलाकारांना दिले व्यासपीठ
दोन्ही नाटय़स्पर्धेत मिळून 32 उत्कृष्ट नाटकाचे सादरीकरण झाले. त्यात सुमारे 950 कलाकार व तंत्रज्ञानी सहभागी घेतला होता. सुमारे साडे नऊ हजार प्रेक्षकांनी नाटय़स्पर्धेला उपस्थिती लावली होती. ग्रामिण भागातील गोमंतकीय कलाकारांनाही एक देशपातळीवर मजल मारण्यासाठी व्यासपीठ प्राप्त व्हावे व आपली कलेचे सादरीकरण करता यावे हा या स्पर्धेमागील एकमेव उद्देश आहे. युवकांनी आपल्याकडे असलेल्या कलेच्या नावाने समाजात ओळख निर्माण करावी असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले
मान्यवरांच्याहस्ते विजेत्या संस्थांना चषक, वैयक्तिक कामगिरीसाठी कलाकार व तंत्रज्ञानाचा पारितोषिके देण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक शांताराम कोलवेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गिरीष वेळगेकर यांनी केले. स्वाती दळवी यांनी आभार मानले.