शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा बैठकीत इशारा : पिरनवाडीजवळील 80 एकर जमीन प्रकरण
प्रतिनिधी /बेळगाव
पिरनवाडीजवळील 80 एकर जमीन वाचविण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय शुक्रवारी मजगाव येथे झालेल्या शेतकऱयांच्या बैठकीत घेण्यात आला. शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी यासंबंधी संपूर्ण राज्यात आंदोलन छेडण्याचा निर्धार व्यक्त केला.
मजगाव येथील शेतकऱयांच्या जनावरांच्या चाऱयाची 80 एकर जमीन बळकावायला देणार नाही. यासाठी एकीने लढा उभारण्याचा निर्णय शेतकऱयांच्या बैठकीत घेण्यात आला. ब्रह्मदेव मंदिरात झालेल्या बैठकीत जनावरांच्या चाऱयासाठीच्या जमिनीचा व्यवहार करणाऱयांचा निषेध नोंदविण्यात आला.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राघवेंद्र नाईक, राज्य उपाध्यक्ष शिवानंद मुगळीहाळ, प्रकाश नाईक, रवी सुप्पण्णावर, शंकर शिवनगेकर, बाळकृष्ण कडलीकर, सहदेव पिंगट, रोहिदास पाटील आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मजगाव, खादरवाडी परिसरातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सोमवारी पुन्हा बैठक
आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी सोमवार दि. 16 मे रोजी सायंकाळी 6 वाजता ब्रह्मदेव मंदिरात पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत चर्चा करून शेतकऱयांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कशा पद्धतीने आंदोलन हाती घ्यावे, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱयांवरील अन्याय सहन करणार नाही. ही जमीन परत मिळविण्यासाठी लढा उभारण्यात येईल, असे राघवेंद्र नाईक यांनी बैठकीत सांगितले.