ऑनलाईन टीम/तरुण भारत
बिहारच्या राजकारणात गेल्या महिन्यात मोठी राजकीय उलथापालथं होत भाजपची सत्ता गेली. या राजकीय घडामोडीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) बिहार दौऱ्यावर पोहचले आहेत. शाह हे दोन दिवसांसाठी बिहार दौऱ्यावर असणार आहेत. यामध्ये त्यांनी पूर्णियातील सभेत बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार Nitish Kumar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नितीशकुमार यांनी एनडीएतून बाहेर पडत लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या आरजेडीसोबत (RJD) राज्यात हातमिळवणी करून पुन्हा सत्ता स्थापन केली. तसंच नितीश कुमार यांच्या नावाची पंतप्रधान पदासाठी होत असलेल्या चर्चेवरून अमित शाह यांनी टीका केली. कुटील राजकारण करून नितीश कुमार पंतप्रधान बनू शकत नाहीत असं अमित शाह म्हणाले.
दरम्यान बिहारमधील पूर्णियात भाजपच्या जनभावना रॅलीला संबोधित करताना शाह यांनी नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी बिहारमध्ये आल्याने लालू आणि नितीश कुमार ना पोटदुखी झाली म्हणत नितीशकुमार यांनी भाजपशी गद्दारी करून स्वार्थाचे आणि सत्तेचे राजकारण सुरू केल्याचे आरोपही अमित शाह यांनी केला आहे.
लालूप्रसाद यादव नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल करत अमित शाह म्हणाले की, माझ्या येण्याने लालू आणि नितीश यांना पोटदुखी होत आहे. ते मी भांडण करण्यासाठी आल्याचे सांगत आहेत. लालूजी तुम्ही भांडण लावून देण्यासाठी तुम्ही पुरेस आहात, आयुष्यभर तुम्ही हेच काम केले, लालूजी सरकारमध्ये आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण मी सीमाभागातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे की, हा सीमावर्ती जिल्हा भारताचाच भाग आहे, इथे कोणालाही घाबरण्याची गरज नाही, कारण केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे. ही गर्दी लालू-नितीश सरकारसाठी धोक्याचा इशारा असल्याचेही अमित शाह म्हणाले.
हे ही वाचा : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर? उच्च न्यायालयात सुनावणी सुरु
अमित शहा पुढे म्हणाले की, बिहारची ही भूमी परिवर्तनाचे केंद्र आहे. इंग्रजांच्या विरोधातील स्वातंत्र्य चळवळ असो किंवा इंदिराजींची आणीबाणी असो, त्याविरोधातील चळवळ बिहारच्या भूमीतूनच सुरू झाली. आज भाजपला फसवून, लालूंच्या मांडीला मांडी लावत बसून, स्वार्थ आणि सत्तेच्या राजकारणाचा जो परिचय नितीशजींनी दिला असा आरोप करत त्याची सुरुवातही याच भूमीतून होणार आहे. आम्ही स्वार्थ आणि सत्तेच्या राजकारणाऐवजी सेवा आणि विकासाच्या राजकारणाच्या बाजूने आहोत. अस अमित शहा म्हणाले.
लालूजी नितीशजी तुमचीही फसवणूक करतील
अमित शाह यांनी नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की, तुम्ही आधी जनता पार्टी देवीलाल गटासोबत गेलात, मग लालूजींसोबत फसवणूक केली. लालूजी तुम्ही काळजी घ्या, उद्या नितीशबाबू तुम्हाला सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतील आणि कोणाला कळणार नाही. नितीश यांनी सर्वात मोठी फसवणूक कोणाची केली असेल तर ती देशाचे दिग्गज नेते जॉर्ज फर्नांडिस यांची केली आहे. त्यांच्या खांद्यावर बसून जनता पक्षाची स्थापना केली आणि जॉर्ज बाबूंची तब्येत बरी नसताना त्यांना हटवून राष्ट्रीय अध्यक्ष बनवले. शरद यादव यांच्यासोबतही त्यांनी तेच केले. त्यानंतर भाजपसोबत फसवणूक, जीतनराम मांझी, रामविलास पासवान यांच्यासोबत फसवणूक केली. नितीशकुमारांनी खुर्ची वाचवण्याशिवाय काहीही केले नाही. पंतप्रधान होण्याच्या लालसेने ते पुन्हा लालूजींसोबत गेल्याचा आरोपही शाह यांनी केला आहे.