अखिलेश यांचे पक्षांतर्गत विरोधकांना आव्हान
वृत्तसंस्था/ लखनौ
राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत मते फुटल्यामुळे समाजवादी पक्ष आणि मित्रपक्षांमधील अंतर्गत मतभेद उफाळून आले असून ज्यांना आमच्यासोबत रहायचे नाही, त्यांनी खुशाल बाहेरचा रस्ता धरावा, असे खुले आव्हान समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिले आहे.
आमच्या पक्षात केवळ नि÷ावंतांनाच स्थान आणि मान असेल. जे संधीसाधू आहेत आणि सत्ता हेच ध्येय मानणारे आहेत, त्यांनी खुशाल पक्ष सोडावा आणि अन्य कोणत्याही पक्षात जावे. आमची आडकाठी असणार नाही. पक्षात रहायचे असेल तर शिस्तीचे पालन अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
राजभर यांनी सोडली साथ
समाजवादी पक्षाच्या युतीतील महत्त्वाचा पक्ष सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाची साथ सोडून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले होते. त्यांच्या पक्षाचे सहा आमदार उत्तरप्रदेश विधानसभेत आहेत. समाजवादी पक्षाने या निवडणुकीत विरोध पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला होता. मात्र, प्रत्यक्ष समाजवादी पक्षातच तीन आमदारांनी पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मतदान केल्याचे दिसून येत आहे.
अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी मुर्मू यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचीही अखिलेश यादव यांनी कडक शब्दात हजेरी घेतली. पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया करण्यापेक्षा सरळ पक्ष सोडा आणि तुम्हाला हवे तिथे जा, असे त्यांनी प्रत्यक्षरीत्या आपल्या काकांनाही सुनावले आहे. शिवपाल यादव यांनीही पलटवार करताना अखिलेश यादव आपल्याला किमान सन्मानही देत नाहीत, अशी तक्रार केली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी स्वतः आपल्याला फोन केला होता आणि द्रौपदी मुर्मू यांना मतदान करण्याची विनंती केली होती. अखिलेश यादव यांनी मात्र तेवढेही सौजन्य दाखविले नाही. अशा स्थितीत अपमान सहन करत पक्षाचा भार किती दिवस वाहायचा? असा प्रश्नही शिवपाल यादव यांनी उपस्थित केला.
अखिलेश अद्यापही बालिश
अखिलेश यादव यांना अद्यापही राजकीय प्रौढत्व आलेले नाही. आपले कोण आणि परके कोण? हे त्यांना कळत नाही. समाजवादी पक्षाच्या बैठकांना आपल्याला आमंत्रित केले जात नाही. आपण पक्षाच्या विरोधात कोणतीही कृती केलेली नाही. केवळ पक्षनेतृत्वाला जागे करण्याचे काम केले आहे. तथापि, अखिलेश यादव यांनी आपला हेतू लक्षात न घेता आपल्याला शत्रूस्थानी मानले आहे, अशी आपली व्यथा आहे, असे प्रतिपादन शिवपाल यादव यांनी केले.
राजभर नाराज
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीचा परिणाम समाजवादी पक्ष आणि त्याच्या युतीच्या विरोधात गेल्यापासूनच युतीतील एक महत्त्वाचे अन्य मागासवर्गीय नेते ओमप्रकाश राजभर नाराज झाले आहेत. समाजवादी पक्षाबरोबर युती झाली, पण समाजवादी पक्षाने प्रत्यक्ष निवडणुकीत सहकार्य केले नाही. समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांना पाठबळ पुरविले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पराभव झाला. तरीही आपल्या व्यक्तिगत प्रभावामुळे पक्षाचे सहा आमदार विजयी झाले. त्यानंतरही युतीत आपल्या पक्षाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. आता वेगळा विचार करण्याची वेळ आली आहे, असे सूचक उद्गार सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी काढले आहेत.
राजभर यांनी समाजवादी पक्षावर जाहीररीत्या आसूड ओढलेले आहेत. अखिलेश यादव यांना छानछोकीच्या जीवनाची सवय लागली असून जनतेत स्थान मिळविण्यासाठी त्यांना सर्व सुखोपभोग सोडून रस्त्यावर उतरावे लागेल. तरच पुढच्या निवडणुकीत तरी प्रभाव टाकता येईल, असा टोमणा राजभर यांनी काही दिवसांपूर्वी लगावला होता. त्यानंतरही त्यांनी अशी विधाने केली आहेत.
राजभर भाजपच्या वाटेवर
समाजवादी पक्षाबरोबर मनभंग झाल्यामुळे राजभर आपल्या पक्षासह भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. लवकरच त्यांचा पक्ष समाजवादी पक्षाबरोबरचा घरोबा मोडून भाजपशी संधान बांधण्याचे पाऊल उचलेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. काही भाजप नेत्यांनीही याला दुजोरा दिला आहे. राजभर यांनी प्रत्यक्ष कोणतेही संकेत दिलेले नसले तरी त्यांची कृती त्यांचे पुढचे धोरण दर्शवून देण्यास पुरेसे आहे, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.