एखाद्या जुन्या काळच्या पत्रातील ओळी वाचाव्या तसे वाटले. पण त्याची मज्जा आजच्या व्हॉटसअप विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना नाही कळणार. तुम्ही एखादी गोष्ट गुप्त ठेवण्यात, जी मज्जा असायची ना, ती या बेधडक उघडय़ा मेसेजमध्ये नाही. पण असा मायना नेमका कधी आणि का सुरू झाला असेल हे शोधताना खूप वेगळीच माहिती मिळाली.
पुराणकाळातील एका कथेत यम नेहमी प्राण घ्यायला स्वतः पृथ्वीवर जायचे पण लोक त्यांना कधीच मान द्यायचे नाहीत की सणसमारंभाला बोलवायचे नाहीत. यम म्हणजे मृत्यूचीच देवता. शेवटी वैतागून यमाने ब्रह्म देवाकडे तक्रार केली. त्याने ती निवारण करताना सांगितले की इथून पुढे तुला कोणी मृत्यूला जबाबदार धरणार नाही. प्रत्येकासाठी मी काहीतरी निमित्त करून ठेवीन. पण मृत्युला निमित्त देताना जगण्याला कारण द्यायला लागेल. म्हणून निमित्तास कारण की….पुराणातल्या प्रत्येक शापासाठी पृथ्वीवर मनुष्य जन्म ठरलेला असतोच. तरीही माणूस अशी काही कर्म करून ठेवतो की पुढच्या जन्माला यायला नेमकं कारण मिळतं. श्वासाची लय मिळताच रडायला सुरूवात करतो, जणू काही पुढे वाढून ठेवलेल्या परिस्थितीत दुःख, आजार, ईर्षा, अहंकार, चढाओढी अशी हजारो कारणं जगण्यासाठी खुणावत असतात, आपल्याला उगीचच वाटत असतं आपण मोठे झालोय, टप्पे ओलांडतोय, असं काहीच नसतं. आपण एका बोगीतून दुसऱयात जात असतो. रेल्वे तीच असते, प्रत्येक स्टेशनवर निरनिराळी माणसं भेटतात, निघून जातात, पण जाता जाता वाट बघण्याचे, प्रेम करण्याचे कारण देऊन जातात. चांगलं बनण्याच्या नादात वाईट मार्गावर कसे काय आलो, याचा विचार करायला लावतात.
आपल्या भोवती कितीतरी माणसं आपल्या असण्याची नोंद ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. जुने मित्र, नातेवाईक यांच्याशी संपर्क साधतात, बँकेत जाऊन पासबुक भरून आणतात. मागच्या आठवणी काढून डोळय़ातल्या पाण्याला वाट देतात पण सोडून मात्र देत नाहीत कारण त्यांचं तेच जगण्याचे कारण असते, एखाद्या दुखण्याबाबतही तेच…. काही माणसं मात्र देवदर्शन, झाडं लावणं, घरकामात मदत करणं, आपली कला जोपासणं, पोथ्या पुराणं, नातवंडात रमणं यातच जगण्याचे कारण शोधून जगणं सुसह्य करतात. पण ज्यांनी नोकरीधंद्यात जन्म घालवला त्यांना निवृत्तीनंतर जगणं फार कठीण जातं, कारण या सगळय़ात त्यांनी मित्र, वाचन, प्रवास, निसर्ग, कला, या गोष्टींना दूरच ठेवलेले असते. अशांना 24 तासाचे काय करावे, असा प्रश्न पडून काळजी निर्माण होते.