राजस्थानात विधानसभा निवडणुकांना प्रारंभ झाल्यापासून प्रथमच शेरगाव नामक खेड्याला स्वतंत्र मतदानकेंद्र मिळणार आहे. हे खेडे अबू-पिंडवारा विधानसभा मतदारसंघात येते. आतापर्यंतच्या कोणत्याही विधानसभा निवडणुकांमध्ये या खेड्यात मतदानकेंद्राची स्थापना करण्यात आली नव्हती. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने या खेड्यात स्वतंत्र मतदानकेंद्र देऊन नवा पायंडा पाडला आहे.
हे खेडे दुर्गम आणि टेकडाळ भागात असल्याने तेथे आजवर मतदानकेंद्र देण्यात आले नव्हते. तसे करणे आर्थिकदृष्ट्या खर्चाचे आणि अडचणीचे आहे, असे मानण्यात येत होते. त्यामुळे या खेड्यातील मतदारांना बऱ्याच अंतरावरील दुसऱ्या खेड्यातील मतदानकेंद्रात जाऊन मतदान करण्याची वेळ येत होती. यावेळी मात्र या खेड्यातील प्रत्येक मतदाराला त्याच्या घरापासून हाकेच्या अंतरावर मतदानकेंद्र मिळणार असल्याने मतदार आनंदित झालेले आहेत. त्यांची अनेक दशकांची इच्छा पूर्ण झाली आहे. या खेड्यात साधारणत: 480 मतदार आहेत.
अन्य खेड्यांमध्येही…
राजस्थानातील दुर्गम भागांमधील अन्य खेड्यांमध्येही यावेळी मतदानकेंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. कांतल का पार या खेड्यातही मतकेंद्र स्थापन होईल. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, असे केंद्रीय निवडणूक आयोगाचे धोरण असून त्यानुसार अशी मतदानकेंद्रे स्थापन केली जाणार आहेत. बारमेर का पार या केवळ 35 मतदार असलेल्या खेड्यालाही केंद्र मिळणार आहे.
या खेड्यातही प्रथमच
शेरगाव या खेड्याप्रमाणे बसेरी विधानसभा मतदारसंघातील काली तीर या गावालाही इतिहासात प्रथमच स्वतंत्र मतदानकेंद्राचा लाभ होणार आहे. हे गाव राजस्थानाच्या धोलपूर या जिल्ह्यात आहे. या खेड्यात 700 हून अधिक मतदार आहेत. पूर्वी त्यांना साडेसात किलोमीटर अंतरावर असलेल्या मतदानकेंद्रात जावे लागत होते. राजस्थानात 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.