पुणे / प्रतिनिधी :
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबाबत मी काही बोलू शकत नाही. त्यांची भाजपशी जवळीक आहे, असे मला तरी वाटत नाही, असे भाजप नेते व राज्याचे मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
बारामती, माळेगाव येथे सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी बारामती कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये उठलेले वादळ, विधिमंडळ पक्षनेतेपदाचा बाळासाहेब थोरात यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर थोरात यांची भाजपाशी जवळीक वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याकडे लक्ष वेधले असता मुनगंटीवार म्हणाले, काँग्रेसमध्ये एकमेकांच्या पायात पाय टाकण्याची परंपरा आहे. थोरातांबद्दल मी काही बोलू शकत नाही. त्यांची भाजपाशी जवळीक वाढली, असे म्हणण्यात काही तथ्य नाही.
अधिक वाचा : ‘TET’साठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
शिक्षक पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यावर आमचे विचार मंथन, आत्मचिंतन सुरू आहे. मुळात आम्ही केवळ जिंकण्याचा किंवा हरण्याचा विचार करत नाही. सत्तेसाठी नव्हे, तर सत्यासाठी काही पण या भावनेने आम्ही काम करतो. विरोधात असतानाही संसदीय आयुधे वापरून आम्ही जनतेचा आवाज नेहमी बुलंद ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे निवडणुका जिंकणे, हे आमचे एकमेव लक्ष्य नाही. तर सामान्यांचे, गोरगरिबांचे मन जिंकणे हे आमचे लक्ष्य आहे. मागच्या चार निवडणुका हरल्या म्हणजे पक्षात काही गडबड आहे, या म्हणण्यात काही अर्थ नाही.