मिनानाथ उपाध्ये यांचे उद्गार
प्रतिनिधी /मडगाव
भाजपने आज देशाच्या हितासाठी काही धाडसी निर्णय घेतले तर विरोध त्वरित भाजपवर हुकुमशाही केल्याचा आरोप केला जातो. त्यांनी अगोदर 25 जून 1975 रोजी स्व. इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांनी देशावर लादलेली आणिबाणीचा काळ आठविण्याची गरज असल्याचे उद्गार मिनानाथ उपाध्ये यांनी काढले.
मडगावात भाजपने 25 जून 1975 साली देशावर लादलेल्या आणिबाणीचा निषेध करण्यासाठी काळा दिवस पाळला. त्यावेळी मिनानाथ उपाध्ये हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. श्री. उपाध्ये यांना आणिबाणीच्या काळात तुरूंगात टाकले होते. ते आणिबाणीचे साक्षीदार होते.
श्री. उपाध्ये पुढे म्हणाले की, देशातील जनता काँग्रेस पक्षाच्या राजवटीवर नाखुष होती. निवडणुकात काँग्रेसला पराभवाची भीती वाटत होती. त्यातून सुटका करण्यासाठी तत्कालिन प्रधानमंत्री स्व. श्रीमती इंदिरा गांधी यांनी हाती असलेल्या सत्तेचा गैरवापर करताना देशावर आणिबाणी लादली. त्यावेळी अनेक नेत्यांना तुरूंगात टाकण्यात आले. सर्व प्रसार माध्यमांवर निर्बंध घातले होते. काँग्रेसच्या राजवटीत नागरीकांच्या मुलभूत अधिकारांना सुद्धा कात्री लावण्यात आली. जेव्हा जेव्हा देशावर संकट ओढवले तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेऊन त्याचा प्रतिकार केला.
12 जून रोजी अलाहाबाद कोर्टाचा निवाडा आला, त्या निवाडय़ात प्रधानमंत्री स्व. श्रीमती इंदिरा गांधी या अयोग्य मार्गाने निवडून आल्याचे म्हटले होते. तेव्हा पासूनच काँग्रेसच्या विरोधात वातावरण निर्माण झाले होते. हा इतिहास आहे. इतिहास हा सातत्याने वाचला पाहिजे. त्याची आठवण पिढय़ान पिढय़ा केली पाहिजे. आम्ही जर इतिहास विसरलो तर आम्ही स्वतालाही विसरणार असल्याचे श्री. उपाध्ये यावेळी म्हणाले.
यावेळी नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, भाजपचे सरचिटणीस दामू नाईक, ऍड. नरेंद्र सावईकर. उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी आपले विचार मांडले. सर्वांनी काँग्रेस पक्षाने लादलेल्या आणिबाणीचा निषेध केला. व्यासपीठावर दक्षिण गोवा भाजपचे अध्यक्ष तुळशीदास नाईक व सर्वानंद भगत उपस्थित होते.