जूनमध्ये लावलेली रोपटीही अतिपावसामुळे नष्ट : वनखात्याला मोठा फटका
प्रतिनिधी /बेळगाव
वादळी पावसामुळे हजारो वृक्ष जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे वनविभागाला मोठा फटका बसला आहे. दरवषी हजारो रोपटी लावण्यासाठी खाते लाखो रुपये खर्ची घालते. मात्र यंदा वादळी पावसाने हजारो झाडांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच फळाफुलांची आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे कोसळली आहेत.
मागील महिन्याभरापासून वादळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पडझडीचे प्रकार वाढले आहेत. त्यामध्ये घरे, झाडे, विद्युत खांब यांचा देखील समावेश आहे. शहरासह ग्रामीण भागातील कमकुवत, सुकलेली झाडे वादळाने कोसळली आहेत. त्यामुळे झाडांच्या संख्येत घट होणार आहे.
बेळगाव विभागातील वन क्षेत्रातदेखील झाडांचे नुकसान झाले आहे. विशेषतः गोल्याळी, लोंढा, खानापूर, कणकुंबी, जांबोटी, नागरगाळी आदी वनक्षेत्रात असलेल्या झाडांची पडझड झाली आहे. तसेच यंदाच्या पावसाळय़ादरम्यान लावलेली रोपटीही अती पावसामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे वन खात्याने वृक्ष लागवडीसाठी केलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाला फटका
वनखात्याच्या सामाजिक वनीकरण विभागाने यंदा ग्रामीण भागातील रस्त्यावर 30 हजाराहून अधिक वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये फणस, पिंपळ, जांभूळ, आंबा आणि इतर वृक्षांचा समावेश आहे. मागील जून-जुलै दरम्यान या रोपांची लागवड झाली होती. मात्र वादळी पावसामुळे यातील काही झाडे कोसळली आहेत. एक वर्षाचे वृक्ष नष्ट झाल्याने सामाजिक वनीकरण विभागालाही फटका बसला आहे.
विद्युत खांब, तारांचे देखील नुकसान
विशेषतः रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांचे अधिक नुकसान झाले आहे. मोठे जुनाट वृक्ष कोसळल्याने काही ठिकाणी विद्युत खांब आणि तारांचे देखील नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. यंदा पहिल्यांदाच वादळी वाऱयासह झालेल्या पावसामुळे झाडांचे नुकसान झाल्याने झाडांची संख्या कमी होणार आहे.
पावसाने रोपांचे नुकसान
मागील काही दिवसांपासून वादळी पावसामुळे बऱयाच ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे. दरवर्षी लाखो रोपटी लावली जातात. मात्र यंदा वादळी पावसाने रोपांचेही नुकसान झाले आहे.
– शिवानंद मगदूम (आरएफओ, वनखाते)