राजीव गांधींसारखी अवस्था करण्याचा इशारा : केरळ भाजप प्रदेशाध्यक्षांना मिळाले पत्र
वृत्तसंस्था/ तिरुवनंतपुरम
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार, 24 एप्रिलपासून केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. पत्रात पंतप्रधानांच्या कार्यक्रमादरम्यान मानवी बॉम्बने आत्मघाती हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. पत्र मल्याळममध्ये लिहिले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींची अवस्था माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखी होईल, असे म्हटले आहे. 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूतील श्रीपेरंबदुर येथे मानवी बॉम्बने हत्या करण्यात आली होती.
एडीजीपी (इंटेलिजन्स) यांनी दिलेल्या अहवालानंतर प्रसारमाध्यमांमध्ये शनिवारी धमकीच्या पत्राचे वृत्त समोर आले. ही बातमी समोर येताच सुरेंद्रन यांनी पत्रकार परिषद घेत राज्याच्या पोलीस प्रमुखांना धमकीचे पत्र सुपूर्द केले असून सुरक्षेची योग्य काळजी घेण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोचीमधून पाठवले पत्र
धमकीच्या पत्रात नाव आणि पत्ताही लिहिला आहे. पोलिसांनी तत्काळ त्या पत्त्यावर धडक मारली. हे पत्र कोचीचे रहिवासी असलेल्या एन. जे. जॉनी यांच्या नावाने लिहिले आहे. मात्र, संबंधितांकडून धागेदोरे सापडू शकले नाहीत. धमकीच्या पत्रात नमूद केलेल्या पत्त्यावर एक व्यक्ती सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला पत्राबद्दल काहीच माहिती नव्हती. चौकशीसाठी दाखल झालेले पोलीस पाहून तो खूप घाबरला. पोलिसांनी त्याचे हस्ताक्षर पत्राच्या हस्ताक्षराशी जुळवले. मात्र, हस्तलेखन वेगळे असल्याचे पोलिसांनी सांगितले. धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने जॉनी यांचा खोटा पत्ता वापरल्याचे दिसून येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
गोपनीय अहवाल लीक
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाविषयक अहवाल लीक करून पोलिसांनी गंभीर चूक केली असून त्याची चौकशी झाली पाहिजे, असा आरोपही सुरेंद्रन यांनी केला आहे. एक गुप्तचर अहवाल लीक झाला आहे. 49 पानांच्या या अहवालात कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांची नावे, त्यांची जबाबदारी, पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा तपशीलवार तक्ता आणि इतर बाबी देण्यात आल्या आहेत.
केरळमध्ये हाय अलर्ट
आत्मघाती हल्ल्याची माहिती मिळताच संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. केरळमधील प्रत्येक बसस्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबतच वाहनांचीही तपासणी करण्यात येत आहे.
24 एप्रिलपासून मोदींची आठ शहरांना भेट
24 एप्रिलपासून पंतप्रधान मोदी 8 शहरांतील सात कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. पीएमओने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मोदी सोमवारपासून 36 तासांत 8 शहरांमध्ये 5,300 किलोमीटरहून अधिक प्रवास करतील. 24 एप्रिल रोजी, पंतप्रधान मोदी दिल्ली ते मध्यप्रदेश नंतर दक्षिणेकडील केरळ, त्यानंतर दादरा आणि नगर हवेली आणि पश्चिमेकडील दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात जातील.