ऑनलाईन टीम / तरुण भारत :
हवाईदलाची तीन लढाऊ विमानं आज सकाळी दुर्घटनाग्रस्त झाली. मध्यप्रदेशातील मुरैनाजवळ ‘सुखोई-30’ आणि ‘मिराज 2000’ ही दोन लढाऊ विमानं कोसळली. तर राजस्थानमधील भरतपूर येथे एक लढाऊ विमान कोसळले. एकाच दिवशी तीन लढाऊ विमानं कोसळल्याने खळबळ उडाली असून, घटनास्थळी बचावकार्याला वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील मुरैनाजवळ पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हवाई दलाचे सुखोई-30 आणि मिराज 2000 ही दोन लढाऊ विमाने कोसळली. या दोन्ही विमानांनी दैनंदिन सरावासाठी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. ही दोन्ही विमानं एकमेकांना धडकली की नाही, याची माहिती अद्याप समोर आली नाही. यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबविले. या विमानातील दोन पायलट सुखरुप असून, एकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
दुसऱ्या घटनेत राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील नागला विसा गावच्या परिसरात हवाईदलाचे लढाऊ विमान कोसळले. यूपीमधील आग्रा येथून या विमानाने उड्डाण केले होते. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य राबवत त्यांनी हवाईदलाला यासंदर्भात कळवले. या विमानाचा अपघात नेमका कसा झाला? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून, पोलिसांकडून गर्दी न करण्याचं आव्हान करण्यात आलं आहे. या दुर्घटनेबाबत संरक्षणमंत्र्यांनी हवाई दलप्रमुखांशी चर्चा केली असून, हवाई दलाने लढाऊ विमान दुर्घटनेची चौकशी सुरू केली आहे.