प्रतिनिधी /कारवार
बेकायदेशीर आणि हिंसात्मकरीत्या वाहतूक करण्यात येत असलेले 6 उंट ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे कांतेश बजंत्री (वय 26, रा. शिडेनूर-बैडगी जिल्हा हावेरी), लॉरी क्लीनर प्रकाश नायक (वय 22, रा. शिडेनूर) आणि इरप्पा नायक (रा. शिडेनूर) अशी आहेत. ताब्यात घेण्यात आलेले तिघेजण 6 उंट लॉरीमधून बेकायदेशीर आणि हिंसात्मकरीत्या हुबळीहून अंकोलाकडे नेत होते. यल्लापूर जोडीकेरे जवळच्या तपासणी नाक्यावर सेवा बजावत असलेल्या पोलिसांनी वाहन तपासणीसाठी थांबविण्याची सूचना केली. तथापी लॉरीचालकाने वाहन न थांबविता तेथून लॉरीसह पसार होण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी पोलिसांनी यल्लापूर येथील संकल्प फाटय़ाजवळ वाहन अडविले आणि लॉरीची तपासणी केली असता 6 उंट हिंसात्मकरीत्या बांधून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तातडीने वाहनातील उंट उतरविले आणि त्यांना चारा-पाण्याची व्यवस्था केली. उंटाची किंमत 3 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. उंटाची वाहतूक कुठून कुठे आणि कशासाठी करण्यात येत होती, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. यल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.