रायगड; रायगड जिल्ह्यातील माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर असणाऱ्या घोणसे घाटात आज ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. श्रीवर्धन कडे जाणाऱ्या एका खासगी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर ३० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे.
मुंबईतील नालासोपारा इथून खासगी बस प्रवासी घेऊन बोर्ली-श्रीवर्धनकडे निघाली होती. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घोणसे घाटात अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून ३० प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले आहे. जखमींना म्हसळा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील मुंबईत राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी येथे येत असताना अपघात झाला, अशी माहिती समोर आली आहे.