मृत एकाच भावकीतील, सुर्लीनजिक अपघात, आर्वी गावावर शोककळा
वार्ताहर/ वाठार किरोली
सुर्ली (ता. कोरेगाव) येथे रविवारी रात्री 10 वाजता इर्टिगा कार पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात आर्वी (ता. कोरेगाव जि. सातारा) येथील एकाच भावकीतील 3 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तुकाराम आबाजी माने, तानाजी आनंद माने, सुभाष गणपत माने अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्या निधनाने आर्वी गावात शोककळा पसरली होती.
आर्वी येथून सातारला हे तिघेही वकिलाकडे कामानिमित्त गेले होते रात्री घरी येताना आर्वी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी उपसरपंच तुकाराम आबाजी माने (वय 65), सेवानिवृत्त भु-कर मापक तानाजी आनंद माने (वय 62), सेवानिवृत्त पोलीस सुभाष गणपत माने (वय 60) हे तिघेजण साताराहून आर्वीकडे येत असताना सुर्ली गावानजीक असलेल्या वळणावर इर्टिगाचा ताबा सुटल्याने ही कार पलटी झाली. इर्टिगाच्या इयर बॅग असूनही फुटल्या होत्या इतका भयंकर अपघात होता. या भीषण अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या तिघांना वाठार किरोली येथील युवकांनी सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रस्त्यातच यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व एकाचा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मृत्यू झाला.
आर्वी येथील तीन जणांचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. तुकाराम माने राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. तसेच तानाजी मानेही भूमिअभिलेख कार्यालयात भु-कर मापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. सुभाष माने पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले होते. अशा या तिनही क्षेत्रातील लोकांच्या अचानक जाण्याने आर्वी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.