रामनगर येथे अपघात : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला
वार्ताहर /रामनगर
रामनगर येथील धारवाड मार्गावर पायी चालत जाणाऱ्या तीन महिलांना चारचाकी वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पार्वती भुजंग पोडशेकर (वय 66), कल्पना कुमाण्णा गावडे (वय 44) आणि पार्वती चोडाप्पा गावडे (वय 58) तिघीही राहणार घार्ली ता. खानापूर अशी अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.
या अपघाताबाबत समजलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील घार्ली या गावातील चार महिला व एक पुरुष येथील नजीकच असणाऱ्या गवेगाळी येथे आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. घार्ली येथून क्रूझरने रामनगरपर्यंत येऊन तेथून पुढे पायी चालत जात असताना तामिळनाडू येथून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या महिंद्रा वाहनाने (टीएन 69, बीक्यू 8067) सदर चालत जाणाऱ्या महिलांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने तीन महिला जागीच ठार झाल्या आहेत. याच मार्गावरून रामनगर येथील पिग्मी कलेक्टर विपिन तिळवे हे जात असताना त्यांनाही धडक बसल्याने जखमी झाले. त्यांना रामनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी मोठी गर्दी केली होती.
दांडेलीचे डीवायएसपी शिवानंद कडगी, जोयड्याचे सीपीआय नित्यानंद पंडित, रामनगरचे पीएसआय बसवराज मबनूर व लक्ष्मण पुजारी आदी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
तिन्ही महिलांचे मृतदेह शवचिकित्सेसाठी रामनगर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले असून घार्ली गावातील तीन महिलांचा एकाचवेळी अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.