प्रतिनिधी /बेळगाव
शहर व उपनगरात ठिकठिकाणी डेनेजवाहिन्यांची समस्या भेडसावत आहे. काही ठिकाणी पक्क्या गटारी न बांधता सांडपाणी सोडण्यात आल्याने गटारीचे पाणी विहिरीमध्ये झिरपून दूषित होत आहे. त्यामुळे ते दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. वडगाव, ओमकारनगर परिसरात डेनेजचे सांडपाणी गटारीत सोडल्याने गेल्या सहा महिन्यांपासून दूषित पाणी प्यावे लागत आहे. मनपाच्या बेजबाबदारपणाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
अनगोळ-वडगाव रस्त्याच्या विकासाचे काम हाती घेतले आहे. ओमकारनगर परिसरातील नाल्याचे बांधकामही करण्यात येत आहे. मात्र याठिकाणी निर्माण झालेल्या डेनेजच्या समस्येकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. याचा फटका रहिवाशांना बसला आहे. गटारींचे सांडपाणी पाझरून ओमकारनगर भागातील विहिरी व कूपनलिकांमध्ये मिसळत आहे. परिणामी विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित बनले आहे. येथील समस्यांचे निवारण करावे अशा मागणीचे निवेदन महापालिकेला देण्यात आले होते.
निवेदन देवून सहा महिने होत आले तरी या समस्येचे निवारण केले नाही. या भागात पाच ते सहा दिवसाआड नळांना पाणीपुरवठा केला जातो. सदर पाणी मुबलक नसल्याने नागरिक विहिरा, कूपनलिकांच्या पाण्याचा वापर करत आहेत. मात्र हे पाणीदेखील दूषित झाल्याने रहिवाशांसमोर समस्या निर्माण झाली आहे. काहीवेळा दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. या नागरिकांकडे नळ नाही त्यांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच त्वचा रोग आणि आजारपणाचा सामना करावा लागत आहे. गटारीतून सांडपाणी वाहत असल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. लहान मुले व वृद्ध नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱयांनी या समस्येची पाहणी करून सांडपाण्याच्या समस्येचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.