शौर्य चौक ते गांधी चौकपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा : मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनधारकांची तारांबळ : रस्ता बनलाय धोकादायक
प्रतिनिधी /बेळगाव
कॅम्प परिसरात अपघातामुळे घडलेल्या घटनेमुळे सकाळच्या सत्रात अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व वाहतूक स्वतंत्रता मार्गाने शर्कत पार्क आणि शौर्य चौकामधून गांधी चौकमार्गे ये-जा करीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. मात्र शौर्य चौक ते गांधी चौकपर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्यावर भलेमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्मयता आहे.
कॅम्प परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः शौर्य चौकापासून गांधी चौकपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. खड्डे चुकविण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याचे नेहमीच निदर्शनास येते. परिणामी अपघात घडतात. हा रस्ता सध्या खूपच धोकादायक बनला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने वाहने कशी चालवायची? असा प्रश्न वाहनधारकांसमोर निर्माण झाला आहे. या रस्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. शहरातील रस्त्यावर वाहतुकीस बंदी घालण्यात आल्याने अवजड वाहनांची वाहतूक दररोज होत असते. त्यामुळे येथील रस्ते दुचाकी आणि लहान चारचाकी वाहनांधारकांना धोकादायक बनले आहेत.
रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्या
ठिकठिकाणी एक फुटापेक्षा अधिक खोलीचे खड्डे निर्माण झाल्याने दुचाकी वाहनधारकांसाठी मृत्यू सापळा बनले आहेत. या खड्डय़ांमधून वाहने चालविताना दुचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाचा जोर वाढल्याने खड्डय़ांमध्ये सतत पाणी साचून राहत आहे. त्यामुळे खड्डय़ांची खोली वाहनधारकांच्या लक्षात येत नाही. परिणामी वाहनांचे अपघात घडत आहेत. येथील खड्डय़ांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने करण्यात आली होती. पण कॅन्टोन्मेंट बोर्डने याकडे कानाडोळा केला आहे. या रस्त्यावरील पथदीप बंद झाले असल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परिसरातील रस्ता अपघातास निमंत्रण देत असून या ठिकाणी वाहनधारकांचा बळी गेल्यानंतरच खड्डय़ांची दुरुस्ती करणार का? असा विचारणा नागरिक करीत आहेत. येथील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.