बाकनूर-इनाम बडस भागातील शाळेच्या इमारती कोसळल्या : उर्वरित वर्गखोल्याही जीर्ण अवस्थेत : विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका : प्रशासनाचे दुर्लक्ष
बहाद्दरवाडी /आण्णाप्पा पाटील
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांनी ‘खेडय़ाकडे चला’ असा संदेश दिला होता. कारण खरा भारत हा खेडय़ातच राहतो. देशाच्या विकासासाठी ग्रामीण भागाचा विकास करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्याही जातात. मात्र ज्या आवश्यक आणि मुलभूत गरजा आहेत याचे म्हणावे तसे परिक्षण होत नाही. असेच चित्र बाकनूर, इनाम बडस भागातील शाळांच्या इमारतींची अवस्था पाहिल्यास निदर्शनास येत आहे. दोन्ही गावातील शाळांच्या इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जीव धोक्यात घालण्याची वेळ आली आहे.
देश 75 वा स्वातंत्र्य महोत्सव साजरा करित आहे. येणाऱया 15 ऑगस्ट रोजी ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक लोकप्रतिनिधी, मान्यवरांची भाषणे अगदी दिमाखात होणार आहेत. त्या दिवशी शाळांसाठी अमुक करू, तमुक करू असा बोलबाला होणार आणि काही महिन्यानंतर सारेजण विसरून जाणार ही वास्तविकता गेल्या कित्येक वर्षांपासून काही भागात दिसून येते. नुकतेच सरकारने शिक्षण खात्यासाठी विविध योजनांचे पॅकेज जाहीर केले आहे. तालुक्यातील शाळांमध्ये सध्या अंडी व चिक्कींचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. अंडी-चिक्की देण्याचा प्रशासनाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हिताचा आहे. मात्र तालुक्याच्या पश्चिम भागातील बाकनूर, इनाम बडस या गावांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्याच नाहीत. त्यांनी शिक्षण घ्यायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बेळगाव शहरापासून 28 किलो मीटर अंतरावर असलेल्या बाकनूर गावच्या शाळेच्या इमारतीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी पालक व शिक्षणप्रेमींतून होत आहेत. गेल्या 15 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात शाळेची इमारत कोसळली. या शाळेच्या विद्यार्थ्यांची पटसंख्या 96 झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारत कोसळलेली माहिती बेळवट्टी ग्रामपंचायत व शिक्षण खात्याला देण्यात आली. यावेळी बीईओनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. इमारतीचे काही फोटोही काढले. पण अद्याप आम्हाला अजून कोणतीच माहिती दिलेली नाही, असे एसडीएमसी कमिटीच्या काही सदस्यांनी सांगितले.
इनाम बडस गावातील जुन्या शाळेची इमारत दि. 7 जुलै रोजी रात्रीच्या वेळी कोसळली. गेल्या 20 वर्षांपासून ही शाळा बंद होती. ग्रामस्थांनी अनेक वेळा ही इमारत पाडवून त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी केली होती. मात्र याकडे प्रशासनाने कानाडोळा केला.
जुन्या शाळेच्या इमारतीच्या बाजूलाच विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी ग्राऊंड व बाजूलाच अंगणवाडी आहे. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या मंदिराजवळील शाळेच्या इमारतीत विद्यार्थी सध्या बसतात. मात्र ही इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यातच आहे. या शाळेत 138 इतकी पटसंख्या आहे.
शाळेच्या विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत
अलिकडे गावा-गावांमध्ये राजकारणाला अधिक महत्त्व आले आहे. प्रत्येक गावामध्ये दोन ते तीन पक्ष हे आहेतच. निवडणुकीच्या काळात जरुर राजकारण करावे. मात्र गावच्या शाळेच्या विकासाच्या बाबतीत कोणीही राजकारण करू नये. एसडीएमसी कमिटी, पुढारी, नेते, ग्रा.पं. आजी-माजी सदस्यांनी एकत्रीतपणे येऊन शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सुविधानीयुक्त इमारती कधी मिळणार?
शाळेची जुनी इमारत कोसळलेलीच आहे. सध्या असलेल्या इमारतीमधील दोन वर्गखोल्या कोसळण्याच्या मार्गावर आहेत. भिंतीची दगडे सरकलेली आहेत. काही ठिकाणी भिंतीना तडा गेलेल्या आहेत. गावात पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असून सध्या दोन वर्गखोल्यांमध्ये शाळा भरविण्याची वेळ आली आहे. आमच्या भागाकडेच प्रशासनाचे दुर्लक्ष का होते? इतक्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त असणाऱया इमारती कधी मिळणार? आम्ही दाद मागायची तरी कुणाकडे.
– के. जे. पाटील (इनाम बडस, एसडीएमसी अध्यक्ष)
अन्यथा बीईओ कार्यालयावर मोर्चा
शाळेची परिस्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. मोठी दुर्घटना होण्याआधिच शाळेची इमारत बांधायला हवी. शाळेची पाहणी करून बीईओ गेलेले आहेत. मात्र अजुनही त्यांचा पत्ताच नाही. कदाचित ग्रामीण भागातील या बाकनूर गावाला येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसावा. संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी शाळेची पाहणी करून त्यावर तोडगा काढावा. अन्यथा बेळगाव ग्रामीणच्या बीईओ कार्यालयावर आम्ही पालक वर्ग मोर्चा काढण्याच्या तयारीत आहोत.
– गणपत गावडे (बाकनूर-एसडीएमसी अध्यक्ष)
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
प्राथमिक शालेय शिक्षण हाच माणसाच्या जीवनातील शिक्षणाचा मुख्य पाया आहे. मात्र बाकनूर इनाम बडस भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पायाच ढासळतो आहे. गळती लागलेल्या शाळांमध्ये बसण्याची वेळ येथील विद्यार्थ्यांवर आली आहे. लोकप्रतिनिधींनी या शाळांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. सार्वजनिक शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी केवळ कार्यालयात बसून न राहता दुर्गम भागातील शाळांच्या इमारतींची पाहणी करावी. आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत.
– रवळू गोडसे (बाकनूर सदस्य एसडीएमसी कमिटी)