ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच तृणमूल काँग्रेसमधील नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. शनिवारी माजी कॅबिनेट मंत्री राजीव बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष या पाच नेत्यांनी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कमळ हाती घेतले. या नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर शाह यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली.
शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘राजीव बॅनर्जी, वैशाली दालमिया, प्रबीर घोषाल, राथिन चक्रवर्ती आणि रुद्रनील घोष यांनी दिल्लीतील माझ्या निवासस्थानी भेट घेऊन भाजपात प्रवेश केला. सोनार बांग्लातील भाजपाच्या लढाईला हे सर्वजण आणखी मजबूत करतील, असा मला विश्वास आहे.’
शुक्रवारी (दि.29) माजी कॅबिनेट मंत्री राजीव बॅनर्जी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. तर 22 जानेवारीला त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मागील महिन्यात आमदार शुभेंदु अधिकारी, जितेंद्र तिवारी आणि शीलभद्र दत्त या आमदारांनीही तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षातील गळती रोखण्याचे ममता बॅनर्जींसमोर मोठे आव्हान आहे.