पक्षातील गळती रोखण्याचे ममतांसमोर आव्हान
ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसमधील काही नेत्यांकडून बंड तीव्र केले जात आहे. मागील दोन दिवसात तीन नेत्यांनी तृणमूलला रामराम केला आहे. आमदार शुभेंदु अधिकारी, जितेंद्र तिवारी यांच्यानंतर आमदार शीलभद्र दत्त यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींची डोकेदुखी वाढली आहे.
बंगालच्या २९४ सदस्यांच्या विधानसभेची निवडणूक पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी सरकारच्या अडचणी वाढत आहेत. पक्षाचे अनेक नेते ममता बॅनर्जींना लक्ष्य करत आहेत. सतत पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे चार दिवसांपूर्वीच पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नेते कनिष्क पांडा यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आमदार शुभेंदु अधिकारी, शीलभद्र दत्त, जितेंद्र तिवारी या आमदारांनी राजीनामे दिले.
आमदार शीलभद्र दत्त यांच्याबरोबर तृणमूलचे नेते कबिरूल इस्लाम यांनीही पक्षाच्या अल्पसंख्यांक सेलच्या महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेले आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तृणमूलमधील गळती रोखण्याचे ममतांसमोर मोठे आव्हान आहे.