अधिकारी-कंत्राटदार यांनी योग्य कारवाई न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा, नगरसेवक लक्ष्मण मादार यांचे आंदोलन
खानापूर : शहरातील अर्धवट स्थितीतील विकासकामांची तातडीने पूर्तता व्हावी, तसेच कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष लक्ष्मण मादार यांनी नगरपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन केले. नगराध्यक्ष नारायण मयेकर, अभियंते राठोड यांनी बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. खानापूर नगरपंचायतीच्यावतीने शहरात नगरोत्थान योजनेअंतर्गत अनेक विकासकामे सुरू आहेत. ही विकासकामे गेल्या दीड महिन्यापासून अर्धवट स्थितीत आहेत. याबाबत ‘तऊण भारत’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर स्थायी समितीचे माजी चेअरमन लक्ष्मण मादार यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता नगरपंचायतीला भेट देऊन अभियंते तिरुपती राठोड, मुख्याधिकारी वठारे यांच्याशी याबाबत विचारणा केली. यावेळी अभियंते तिऊपती राठोड यांनी लक्ष्मण मादार यांना कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे मादार यांच्यासह इतर नगरसेवकांनी मंगळवारी नगरपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन केले. दोन तास अधिकारी, कर्मचारी बाहेर असल्याने तारांबळ उडाली. याबाबत लक्ष्मण मादार यांना विचारले असता ते म्हणाले, नगरोत्थान योजनेतून शहरात दोन कोटीच्या निधीची विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. ही सर्वच कामे एकाच कंत्राटदाराकडे असल्याने कामे योग्य पद्धतीने होत नसून सर्वच ठिकाणी खोदाई करून ठेवल्याने गेल्या दीड महिन्यापासून नागारिकांची गैरसोय होत आहे. नागरिकांचा रोष नगरसेवकांवर असल्याने आम्हास नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्याधिकारी व अभियंते कंत्राटदाराला पाठीशी घालत आहेत. यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. नगरोत्थान योजनेचे वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदार येऊन कामे वेळेत पूर्ण करावित, अशी आमची मागणी आहे. या आंदोलनाला नगराध्यक्ष नारायण मयेकरसह इतर सर्वच नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. शहरातील नगरोत्थानच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. ही सर्व कामे अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांना गेल्या महिन्याभरापासून त्रास होत आहे. ठेकेदारही कामे वेळेत पूर्ण करत नसल्याने आज आंदोलनाचा पवित्रा हाती घेण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष नारायण मयेकर, माजी स्थायी समिती चेअरमन प्रकाश बैलूरकर, नगरसेवक आपय्या कोडोली, रफिक वारीमणी यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.
आजच्या सभेत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन
बुधवारी नगरपंचायतीची मासिक सर्वसाधारण सभा आहे. या सभेत अर्धवट कामाबाबत योग्य निर्णय झाला नसल्यास पुन्हा उग्र आंदोलन हाती घेण्यात येणार असल्याचे मादार यांनी सांगितले. नगराध्यक्ष नारायण मयेकर व अभियंते तिऊपती यांनी बुधवारी होणाऱ्या मासिक सभेत कंत्राटदार व मुख्य कार्यकारी अभियंत्यांना बोलावून याबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल, असे सांगितल्यानंतर लक्ष्मण मादार यांनी आपले आंदोलन मागे घेतले.