अध्याय एकविसावा
भगवंत म्हणाले, वेदांनी स्वधर्माचरण करावे हे प्राण्यांच्या कल्याणासाठीच सांगितले आहे. तसेच विषयत्यागासाठीच गुणदोषांचे निरूपण केले आहे. खरा वेदाचा अर्थ ज्यांना कळत नाही, ते वेद हा प्रवृत्तीपर आहे असे म्हणतात पण वेदाने विषयावरील आसक्ती नष्ट करणारी विरक्तीच सांगितलेली आहे. स्वधर्मस्थितीने राहिले असता विषयांविषयी विरक्ती उत्पन्न होते आणि प्राणी मोक्षाला जातात.
वेदाची आज्ञा सोडून केवळ विषयांचीच आसक्ती धरली असता प्राणी अत्यंत दुःख पावतात. प्रवृत्ती म्हणजे आपला स्वधर्म सोडून स्वतःच्या बुद्धीने इतर गोष्टी करायचा प्रयत्न करणे पण उद्धवा स्वधर्म सोडून इतर गोष्टी करणे अनर्थकारक आहे. ज्याचे मन सदासर्वदा विषयाच्या गोडपणाचाच निदिध्यास करीत असते, त्याला अतिशय घोर विषयासक्ती उत्पन्न होत असते.
विषयासक्ती वाढली की, निर्लज्ज काम खवळून उठतो आणि त्या कामाकरिता तो अतिशय संकटाचे व दुर्गम प्रसंग सहन करत राहतो. विषयाच्या तृप्तीसाठी जेव्हढे म्हणून उपाय योजले जातात, ते पदोपदी अपायरूपच होतात. जोपर्यंत विषयवासनेची परिपूर्तता होत नाही, तोपर्यंत माणसाची मोठी तगमग होत असते.
जेव्हा विषय तृप्ती होत नाही असे दिसते तेव्हा मनःस्थिती बिघडवण्यास साहाय्य करणारा अत्यंत दुर्धर असा क्रोध चवताळून उठतो. क्रोध चवताळला म्हणजे बुद्धीचे ज्ञान तत्काळ नष्ट होऊन जाते आणि चांगले काय आणि वाईट काय हे सांगणारा विवेक नष्ट होतो.
विवेकाचे भान लोपले की, चेतनाही स्तंभित होते आणि त्यामुळे कार्य कोणते व अकार्य कोणते ह्याची आठवणही बुजून जाते. चेतना शक्ती लुप्त झाल्याने मनुष्य असून नसल्यासारखा होतो. एखाद्या मूर्छा आलेल्या किंवा मेलेल्या माणसाप्रमाणे त्याची अवस्था होते. अशा स्थितीत तो स्वार्थाला पूर्ण मुकतो. स्वार्थ कोणता विचारशील तर स्वतःचा उद्धार करून घेणे, त्यासाठी झटणे हाच खरा स्वार्थ होय. मनुष्य विवेकशून्य होऊन केवळ मूढ बनला म्हणजे तेथे विषयही नाही आणि परमार्थही नाही अशी त्याची स्थिती होते. सन्मार्गाची वाट कळत नाही, त्यामुळे पदोपदी आत्मघात मात्र होत असतो. तो केवळ जड मूढ होऊन बेशुद्धाप्रमाणे स्तब्ध होतो आणि अज्ञानपणामध्ये कुचंबत असतो. अशाप्रकारे धड सजीवही नव्हे आणि धड निर्जीवही नव्हे, अशा प्रकारे मूढ होऊन राहतो आणि असलेल्या लाभाला मुकून अनर्थ मात्र अंगावर ओढवून घेतो. विषयांचे चिंतन करता करता जो स्वतःला ओळखत नाही त्याचे जीवन वृक्षाप्रमाणे ज्ञानशून्य होते. लोहाराच्या भात्याप्रमाणे त्याच्या शरीरात श्वास चालू असतो इतकेच. विषयाच्या आसक्तीमुळे तमोगुणाने वृत्तीला ग्रासून टाकल्याने कोणतीच आठवण राहत नाही. मी कोण हेही मनाला स्मरत नाही! दारू प्याला म्हणजे मनुष्य जसा झिंगून जातो आणि त्याला विस्मरण होऊन मनांत भ्रम उत्पन्न होतो किंवा विषमज्वर झालेला मनुष्य हवी तशी बडबड करतो, त्याला आपले व परकेही आठवत नाहीत. तो व्यर्थ भलभलते बरळत सुटतो, त्याप्रमाणे मनुष्यप्राणी भ्रमाने भुललेला असतो. चित्ताला भ्रम झाल्यामुळे त्याला भलभलतेच आठवते. त्याला कशाचीच नीट आठवण असत नाही.
याप्रमाणे प्राणी संकटांत कुचंबत असतात. अंगात भूतसंचार झाला म्हणजे तो मनुष्य ‘हः हः हः हः’ असें म्हणून हुंकारे देत बसतो आणि चित्ताला भुरळ पडून आपण स्वतः कुत्रेच आहे असे मानून भुंकत असतो.
अशाच रीतीने निजलेला मनुष्य आपलेपणाचे भान विसरून स्वप्नात जसा घाबरतो आणि मी रणात पडलो असे म्हणतो, त्याप्रमाणेच हे सारे प्राणी भुललेले आहेत. याप्रमाणे मिथ्याच भुलीने भूल पडून कामाच्या मोहाने प्राणी व्यापून गेले आहेत. आणि जडमूढ होऊन अंतःकरणात वेडावले आहेत.
क्रमशः