कोरोना संसर्गाचा कल पाहून पुढील निर्णय : मुख्यमंत्री
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 आज 6 जूनपासून सुरू होत आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे बराच काळ बंद राहिलेल्या शाळा आज नव्या जोमाने पुन्हा सुरु होणार आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग होत असल्याने काहीसे चिंतेचे वातावरण असले तरी नव्या उत्साहाने हे शैक्षणिक वर्ष सुरु करुया, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. येत्या 10 ते 15 दिवसातील कोरोनाच्या संसर्गाचा कल पाहून त्याबाबतचा पुढील निर्णय करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरच ती वाढ झाल्याने पालकांसह मुलेही चिंताग्रस्त बनली आहेत. मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला असून शाळा सुरू होत असल्याने मुलांना शाळेत पाठवल्याशिवाय पालकांसमोर कोणताही पर्याय नाही.
सरकार कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्याचा अभ्यास चालू आहे. आगामी 10 ते 15 दिवसातील अभ्यास करून मग काय ते ठरवणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. सध्या तरी कोरोनाबाबत कोणतेही निर्बंध नाहीत असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान कोरोना संसर्गाचे रूग्ण वाढत असले तरी हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागत नसल्याने तसेच बळी जात नसल्याने तीच मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. शिवाय गंभीर दखल घ्यावी असा संसर्ग नसल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकार आणखी 10 ते 15 दिवस तरी काहीच ठरवणार नसल्याचे समोर आले आहे.
रविवारी सापडले नवे 41 बाधित
कोरोनाच्या संसर्गाने राज्यात पुन्हा एकदा डोके वर काढले असून गेल्या 24 तासात म्हणजे रविवारी 41 नवे रूग्ण आढळले आहेत, तर 12 जण बरे झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या वाढून 262 वर पोहोचली असून ती दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात रविवारी 581 जणांचे नमुने तपासण्यात आले, त्यात 41 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या सर्वांना गृह विलगीकरण देण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण 246023 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 241929 जण कोरोनामुक्त झाले आहेत. बळींचा आकडा स्थीर म्हणजे 3832 एवढाच राहिला असून गेल्या अनेक दिवसांपासून तो वाढलेला नाही हीच दिलासा देणारी बाब आहे. त्याशिवाय इस्पितळात कोणालाही भरती करावे लागले नाही. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत कोरोना रुग्णांची किरकोळ प्रमाणात वाढ होताना दिसत होती. दहा ते बारा रूग्ण सापडत होते. ती संख्या आता वाढत असून प्रतिदिन 40 ते 50 रूग्ण सापडत असल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर याचे पालन होताना †िदसत नाही.