ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून काल शिंदे-फडणवीस सरकारने पहिली परीक्षा पास केली. मात्र, आज होणाऱ्या बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारची खरी कसोटी लागणार आहे. बहुमत चाचणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडून आपापल्या आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं असून, त्यासाठी रणनीती ठरवण्यात आली आहे. आतापर्यंत शिंदे आणि फडणवीस यांचे डावपेच यशस्वी ठरले असले तरीही प्रत्यक्ष मतदानावेळी काय होईल, हे सांगता येत नाही. कारण हे सरकार बहुमत सिद्ध करु शकणार नसल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनेकदा केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी यात काही विघ्न आणणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.
विधिमंडळाचे कामकाज सुरू झाल्यावर 11 वाजता बहुमत चाचणीसाठी आवाजी पद्धतीने मतदान होणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी काल शिंदे आणि फडणवीस सरकारच्या आमदारांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी आपापल्या आमदारांना मार्गदर्शन केले असून, रणनीती ठरवण्यात आली आहे. संख्याबळाच्या जोरावर विधानसभा अध्यक्षपदाची निवड करणे काल नव्या सरकारला सोपे गेले. पण आज या सरकारला बहुमत चाचणीचा सर्वात मोठा टप्पा पार करावा लागणार आहे. सरकारकडे संख्याबळ असल्याने बहुमताचा आकडा गाठण्यास कोणतीच अडचण येणार नसल्याचे दिसत आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानावेळी काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत आहे. विधानसभेत पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे बहुमत चाचणीत देखील सरकार नक्की यशस्वी ठरेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटनेतेपदाला वैध ठरवलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही वैध ठरवण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेने आमदारांनी व्हीप न पाळल्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडे 39 आमदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे.