कर्नाटकच्या 15 व्या विधानसभेचे 14 वे अधिवेशन आजपासून सुरू झाले. मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सभागृहाचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
विधानसभेचे 14 वे अधिवेशन आज 19 डिसेंबर रोजी बेळगावातील सुवर्णसौध येथे सुरू झाले. सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी निधन झालेल्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव संमत केला.
यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उपसभापती आनंद मामनी, मुलायम सिंह यादव, अब्दुल समद सिद्दीकी, कोळूर बसवनगौडा, बोम्मन्ना, श्रीशैलप्पा बिदनूर, चरण सिंग या दिग्गज नेत्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यानंतर विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी मुलायम सिंह, एसएन पाटील, अब्दुल समद सिद्दीकी, सुधींद्रराव कसबे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्यासोबत घालवलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
यानंतर आमदार बंडेप्पा काशमपूर, सीसी पाटील, माजी मुख्यमंत्री आणि शिकारीपूरचे आमदार येडियुरप्पा, यूटी खादर, एचके पाटील, सोमशेखर रेड्डी, नाडगौडा, तुकाराम आणि मंत्री शशिकला जोल्ले यांनी श्रद्धांजली वाहिली. बेळगाव जिल्ह्यावर वारंवार दुःखाचे डोंगर कोसळत असल्याची नाराजी व्यक्त केली. प्रथम खासदार सुरेश अंगडी, नंतर आमदार उमेश कट्टी आणि आता उपसभापती आनंद मामनी यांच्या निधनाने बेळगांव जिल्हा अनाथ झाल्याचे सांगितले.
यानंतर 2 मिनिटे मौन पाळण्यात आले आणि त्यानंतर सभागृहाचे कामकाज मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.