सेन्सेक्स 509 अंकांनी कोसळला ः विदेशी संकेताचा प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात सलग सहाव्या सत्रातही घसरणीचा प्रवास सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये बुधवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स तब्बल 509 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे. यामध्ये जागतिक बाजारांमधील प्रमुख घडामोडींमध्ये जागतिक शेअर बाजारातील नकारात्मक कल तसेच विदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी सलगपणे आपले भांडवल काढून घेतल्याच्या कारणास्तव बाजारात ही स्थिती निर्माण झाली असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बीएसई सेन्सेक्स 509.24 अंकांनी प्रभावीत 0.89 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 56,598.28 वर बंद झाला आहे. याच दरम्यान काहीवेळ सेन्सेक्स 621.85 अंकांनी प्रभावीत झाल्याची नोंद करण्यात आली. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 148.80 अंकांनी प्रभावीत होत निर्देशाक 16,858.60 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये आयटीसी, ऍक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा स्टील, इंडसइंड बँक, भारतीय स्टेट बँक, एचडीएफसी लि. आणि एचडीएफसी बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेंट्स, सनफार्मा, डॉ.रेड्डीज लॅब आणि पॉवरग्रिड कॉर्प यांचा तेजीमध्ये समावेश आहे.
आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियातील कोस्पी, जपानचा निक्की, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. यावेळी युरोपीयन बाजारात घसरणीचा कल राहिला. मात्र अमेरिकन बाजारात मिळता जुळता कल राहिला होता.
जागतिक पातळीवर मंदी सदृश्य स्थितीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण होत असल्याने याचा परिणाम हा देशातील बाजारांवर झाला आहे. यामुळे विदेशी गुंतवणूकदार आपले भांडवल काढून घेत सुरक्षित गुंतवणुकीचा मार्गशोधत आहेत. जागतिक स्थिती सकारात्मक होत नाही तोपर्यंत बाजारात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहे.