कुंभारजुवे/प्रतिनिधी
टोलटो ते धावजी जलमार्गावरील फेरी सेवा या दिवसात वारंवार कर्मचारी दुसऱया ठिकाणी पाठवुन बंद ठेवली जात आहे त्यामुळे ही फेरी बोट पकडून कामाला जाण्यासाठी येणाऱयांना इथे फेरी बंद मिळाल्याने मोठा वळसा घालून कामावर जावे लागते . त्यामुळे एकतर कामाला दांडी मारावी लागते किंवा अध्या? दिवसासाठी कामावर जावे लागते त्यामुळे नागरिक व वाहनचालकांत कमालीचे नाराजीचे वातावरण पसरले आहे.
सदर फेरी बोट सेवा सांतईस्तेव्ह व जुने गोवे पंचायत क्षेत्रातील नागरिक व वाहनचालकांना एकदम उपयुक्त व सोयिस्कर आहे. त्यामुळे या पंचायत क्षेत्रातील लोक तीचा वापर अग्रक्रमाने करीत असतात. विशेष म्हणजे या फेरी मागे? जवळ जवळ दहा किलोमीटरचा वळसा आणि कमी वेळ तसेच जूने गोवे इथल्या रेल्वे गेटच्या पासून सुटका मिळते. आजच्या महागाईच्या काळात खासगी नोकरी करणाऱयां कामगारांना ही फेरी वरदान म्हटली तर अतिशयोक्ती होणार नाही.
या दिवसांत या फेरीबोटीचे बंद ठेवणे नित्याचेच झाले आहे. इथले कर्मचारी एकतर जुने गोवे, अथवा गंवडाळी, किंवा वांशी येथे पाठविले जातात.
या भागाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी एका कार्यक्रमात सुतोवाच करून , आपल्या मतदारसंघातल्या कुठल्याही फेरी सेवेची कुठलीही समस्या असली तर मला त्याची कल्पना द्यावी ती लगेच सोडविली जाईल असे आश्वासन दिले होते.
या अगोदर काही दिवसांपूर्वी असेच प्रकार इथे घडले होते व त्यासंबंधी दै. तरुण भारतमधून आवाज उठवला होता. तरीही या जलमार्गावर हे फेरी बोट बंद ठेवण्याचे प्रकार हमखास चालू आहेत.
वास्तविक या दोन्ही पंचायती (सांतईस्तेव्ह व जुने गोवे) कुंभारजुवे मतदारसंघात येतात तरी आमदार राजेश फळदेसाई यांनी याप्रकरणी त्वरित लक्ष घालून इथले हे गैरप्रकार थांबवुन इथल्या नागरिक व वाहनचालकांना दिलासा द्यावा अशी त्यांची मागणी आहे.