प्रतिनिधी/ सातारा
साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणारा अक्षय्यतृतीया व इस्लाम धर्मीयांचा महत्वाचा मानला जाणारा रमजान ईद हे सण मोठय़ा उत्साहात मंगळवारी साताऱयात साजरे करण्यात आले. जवळपास 50 वर्षानंतर हे दोन्ही सण एकत्रित येण्याचा योग जुळून आला होता. यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण पहावयास मिळत होते.
त्यातच हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला खूप महत्त्व आहे. या दिवसाला शुभ तिथी मानले जाते. अक्षय्य तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, यासह कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी शुभ कार्य करता येते. हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱया दिवशी येते. यादिनाचे औचित्य साधून जवळपास सर्वांच्या घरी पुरणपोळी व आमरसाचा बेत आखण्यात आला होता.
तसेच मुस्लिम कॅलेंडरमध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, चंद्रदर्शन झाल्यावर ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद सजरी करण्यात आली. ईदनिमित्त खाद्यपदार्थांची रेलचेल ही सर्वच मुस्लिम बांधवांच्या घरी दिसून आली. त्यातच दूध, सुकामेवा आणि शेवयापासून बनवलेल्या शीर खुरम्याचे विशेष बेत आखण्यात आला होता. साताऱयातील ईदगा मैदानावर सालाबाद प्रमाणे यंदाही सामुहीक नमाजपठण करण्यात आले. त्यानंतर मुस्लिम बांधवांतर्फे गळाभेटी देऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणावर गर्दी
दोन्ही सणाचे औचित्त्य साधून बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे साडीतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त असल्याने अनेकांकडुन सोने खरेदी केले जाते. त्यामुळे मंगळवारी साताऱयातील सराफ दुकानांमध्ये खरेदीकरीता एकच गर्दी झाली होती. दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करण्याकरीता ही वाहनांच्या शोरूममध्ये मोठय़ा प्रमाणात ग्राहकांची गर्दी झाली होती.
अनेक नवीन व्यावसायांची सुरूवात
अक्षयतृतीया व रमजान या दोन्ही सणांचे औचित्य साधून अनेक नूतन व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाला सुरूवात केली होती. त्यामुळे मंगळवारी अनेक नूतन दुकानदारांचा उद्घाटन समारंभ पार पडले. त्यामुळे मंगळवारी बाजारपेठेत सर्वत्र एकच गर्दी पहावयास मिळाली
दर वाढीव असून सुध्दा आंब्याला मागणी
अक्षयतृतीया सणाचे औचित्य साधून अनेकांच्या घरी आमरस आणि पुरणपोळीचा बेत आखण्यात येतो. त्यामुळे बाजारपेठेत आंब्याच्या दरात जरी वाढ असली तरी त्याची खरेदी मोठय़ा प्रमाणात करण्यात येत होती. बाजारपेठेत मंगळवारी 1 हजारा रूपयांपासुन ते 650 रूपये डझन या प्रमाणे हापूस, देवगड आंब्याची विक्री करण्यात येत होती.