संतप्त व्यापारीवर्गाचे एपीएमसी कार्यालयासमोर धरणे : जिल्हाधिकाऱयांनी एपीएमसी भाजीमार्केटला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्याची मागणी
वार्ताहर /अगसगे
जय किसान भाजीमार्केटने गैरमार्गाने परवाना घेऊन बेकायदा भाजीमार्केट सुरू केले आहे. त्यामुळे त्यांचा परवाना रद्द करावा, या मागणीसाठी एपीएमसीमधील भाजी दुकानदार व व्यापारी आणि भारतीय कृषक समाजाच्यावतीने गेल्या 135 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्यामुळे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एपीएमसीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी व्यापारी व भारतीय कृषक समाजाच्यावतीने करण्यात येऊन धरणे आंदोलन छेडले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील गेल्या एक महिन्यापासून जिल्हय़ातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये अचानक भेटी देऊन त्याठिकाणची पाहणी करीत आहेत. एपीएमसीमध्ये जय किसान या खासगी भाजीमार्केट विरोधात आम्ही आंदोलन करीत आहोत. तरी अद्याप त्याकडे एकदाही जिल्हाधिकाऱयांनी भेट दिली नाही. त्यामुळे संतप्त दुकानदार आणि भारतीय कृषक समाजाचे जिल्हा अध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी एपीएमसी कार्यालयासमोर प्रशासनाच्या कारभाराविरोधात ठिय्या आंदोलन छेडले.
याबाबत एपीएमसीचे सेक्रेटरी के. एच. गुरुप्रसाद यांनी, जिल्हाधिकारी कार्यालयाला भाजी दुकानदारांच्या आंदोलनाबाबत कळविले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सोमवार दि. 20 रोजी बैठक बोलाविल्याचे सांगितले.
खासगी जय किसान भाजीमार्केटने बेकायदा परवाना मिळवून गांधीनगर येथे दि. 3 जानेवारी रोजी भाजीमार्केट सुरू केले. यामुळे सरकारी एपीएमसी भाजीमार्केटवर याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. येथील व्यवहारही ठप्प झाले आहेत. परिणामी दर आठवडय़ाला या एपीएमसीला लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे 20 रोजी होणाऱया जिल्हाधिकाऱयांबरोबर होणाऱया बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बँकांकडून नोटिसा…
एपीएमसीमध्ये सरकारी भाजीमार्केट असल्यामुळे येथे 132 दुकान गाळय़ांचे लिलाव करण्यात आले. प्रत्येक दुकानाला भाजी दुकानदार सुमारे 20 लाखापासून ते 1 कोटी 4 लाखापर्यंत किमत मोजून दुकान खरेदी केले. या दुकानांमध्ये एक वर्ष सुरळीत व्यवहार झाले. याचा एपीएमसीला करोडो रुपयांचा फायदा झाला. मात्र, बेकायदा सुरू करण्यात आलेल्या जय किसान भाजीमार्केटने परवाना मिळवून दि. 3 जानेवारीपासून हे भाजी मार्केट सुरू केले. तेव्हापासून एपीएमसीमधील भाजीमार्केटच्या व्यवहारावर परिणाम झाला असून येथील व्यापाऱयांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. मोजक्याच दुकानांमध्ये व्यवहार सुरू आहेत. तर इतर दुकाने बंद पडली आहेत. ही दुकाने खरेदी करण्यासाठी बँकांमधून कर्जे घेतली होती. मात्र व्यवहार ठप्प झाल्याने भाजी दुकानदार, व्यापाऱयांना बँकांचे हप्तेसुद्धा भरता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजी दुकानदार व्यापाऱयांना बँकाकडून हप्ते भरण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजी दुकानदार हताश झाले.