सुधाकर काशीद, कोल्हापूर
Kolhapur News: पायवाटेचा आधार खूप मोठा असतो.पण काळाच्या ओघात हळूहळू पायवाट पुसली जाते.आणि नव्या मार्गाची उभारणी होते.पुसली गेलेली पायवाट हळूहळू भूतकाळात गडप होऊन जाते.पण ही गडप झालेली पायवाट शोधण्याची मोहीम कोल्हापूरच्या मैत्रेय प्रतिष्ठानने राबवली. आणि जिह्याच्या पश्चिमेला असलेल्या अणुस्कुरा घाटापूर्वी हजारो वर्षाच्या पायवाटेची धूळ कपाळाला लावली.कोकणाला जोडणारा अणुस्कुरा घाट आज नव्याने तयार झाला आहे.पण घाट तयार होण्यापूर्वी कोल्हापूर ते कोकण अशी दुर्गम पायवाट होती.काळाच्या ओघात दडलेल्या या पायवाटेवरचे अडथळे बाजूला सारत निम्मी पायवाट बऱ्यापैकी पुन्हा प्रकाशात आणली.
कोल्हापुरातून कोकणात उतरण्यासाठी जिह्याच्या पश्चिम टोकाला आंबा,फोंडा,करूळ,भुईबावडा आंबोली,अणुस्कुरा,पारगड,माचाळ शिवडाव,पडसाळी,चिकेवाडी येथून पायवाटा होत्या.या पायवाटेवरून रेडा,घोडा यांच्या पाठीवरून साहित्याची ने आण केली जात होती.कोकणातून कोल्हापूर जिह्यात मासे मीठ व कोकणातील बंदरात उतरल्या गेलेल्या मालाची वाहतूक या पायवाटेनेच होत होती.याच पायवाटेने कोकणात कोल्हापुरातून गूळ व इतर साहित्य जात होते.तत्कालीन परिस्थितीचा विचार करता या पायवाटेनेच लोकांची ये जा होत होती.विशेषतः जिह्याच्या पश्चिम टोकाला असलेल्या गावातील वाड्या वस्तीवरील लोक या पायवाटेनेच खाली कोकणात उतरत होते.बाजारहाट कोकणातूनच करत होते.
काळाच्या ओघात आंबा फोंडा,आंबोली,करूळ भुईबावडा,अणुस्कुरा हे पक्के घाट बांधले गेले.व या पायवाटा हळूहळू निर्मनुष्य झाल्या.गवत,झुडपे,रानवेली यात गडप होत गेल्या.घाट मार्गे वाहनांची ये जा वाढली आणि कोल्हापूर जिह्याच्या पश्चिम टोकाकडून खाली कोकणात उतरण्यासाठी पायवाटा होत्या ही एक दंतकथाच बनवून गेली.चांगले रस्ते तयार झाल्यावर मूळ पायवाट काळाच्या आड दडली गेली.
मैत्रेय प्रतिष्ठानच्या डॉ.अमर अडके यांच्या मनात मात्र मूळ पायवाटेबद्दल खूप उत्कठता होती.घाट होण्यापूर्वी वापरात असलेल्या या पायवाटा कशा असतील हे जाणून घेण्याची त्यांची धडपड सुरू होती.कळे,बाजार भोगाव,करंजफेण यांच्या पुढे अणुस्कुरा गाव आहे.अलीकडे जो घाट तयार झाला आहे या घाटामुळे राजापूरचे अंतर कमी झाले.घाट होण्यापूर्वी अणुस्कुरातून कोकणात जाणाऱ्या पायवाटेची चर्चा ताजी होती.त्यामुळे त्यांनी आपल्या बबन जाधव या सहकाऱ्यासह घाटाच्या पायवाटेचा धांडोळा सुरू केला. त्यावेळी त्यांना घाटाजवळ राजू पत्की यांचे एकच घर दिसले.हे एकच घर इतक्मया दुर्गम परिसरात त्यामुळे त्यांनी पत्कींशी संपर्क साधला.
अणुस्कुऱयातील अनेक ज्येष्ठांशीही चर्चा केली.व घाटाजवळ मारुती मंदिर,उगवाई मंदिरापासून खाली जिवंत पाण्याचा झरा,पायरी रस्त्याचे दगडी टप्पे,एक भग्न शिलालेख असल्याची माहिती त्यांना ग्रामस्थांच्याकडून मिळाली.घाट होण्यापूर्वी आम्हीही याच वाटेने खाली कोकणात येरडव गावापर्यंत जात होतो असे काहींनी सांगितले.त्यामुळे डॉ.आडके यांनी त्यांच्या मैत्रेय प्रतिष्ठानच्या वतीने अणुस्कुरा घाट पायवाट मोहीम आयोजित केली.सुरुवातीला मार्ग बऱ्यापैकी चांगला. पण पुढचा मार्ग झाडीझुडपे दगड मातीत गडप झाला होता. जवळजवळ तीन तास चालत त्यांनी बऱ्यापैकी मूळ पायवाटेने कोकणात उतरणे सुरुवात केले.ते पायवाटेच्या शेवटपर्यंत पहिल्याच टप्प्यात पोहोचू शकले नाहीत.पण मूळ पाय वाटेला आपले पाय त्यांनी लावले.त्या पायवाटेवरची धुळही कपाळाला लावली.व ही पायवाट मोहीम टप्प्याटप्प्याने एकदा पूर्ण करून कोकणात उतरण्याच्या संकल्पाची त्यांनी यानिमित्ताने सुरुवात केली.