मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन, भाजप युवा मोर्चातर्फे युवती संमेलन
प्रतिनिधी / पणजी
दिल्ली आणि गोव्यात असलेल्या भाजपच्या डबल इंजिन सरकारने गोव्यासह देशात राबविलेल्या विविध योजनांमुळेच देशाचा विकास होत आहे. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा गोव्यातील नागरिकांना मोठा फायदा मिळत आहे. त्यामुळे गोव्याचाही विकास होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी युवक-युवतींनी मोदी ब्रॅन्डअॅम्बेसेडर बना, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे पणजीत आयोजित केलेल्या युवती संमेलनात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, राष्ट्रीय भाजयुमोच्या उपाध्यक्षा अर्पिता बडेजेन, भाजपचे नेते दामू नाईक, गोवा भाजयुमोचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, प्रा. सुलक्षणा सावंत, भाजयुमोच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा अर्पिता बदाजेना, रिमा सोनुर्लेकर, अखिल पर्रीकर व इतर सदस्य उपस्थित होते.
महिलांचा विकास हा मुख्य हेतू : खासदार तानावडे
भाजपतर्फे नेहमीच महिलांचा आदर केला गेला आहे. मंत्रिमंडळामध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे काम भाजपने केले आहे. भाजपने कधीच महिला -पुऊष असा भेदभाव केलेला नाही. म्हणूनच आज देशातील महिला सक्षम झाल्या आहेत. मागील अनेक वर्षे काँग्रेस सरकारच्या काळात महिलांना योग्य ते व्यासपीठ दिले जात नव्हते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. आज राज्य तसेच देशभरातील महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहे. महिलांसाठी विविध योजनाही भाजपने सुऊ केल्या आहेत. देशभरातील महिलांचा विकास व्हायला हवा हा भाजप सरकारचा मुख्य हेतू आहे. तसेच राज्यात मुद्रा योजनेचा लाभ जास्त प्रमाणात महिलांनी घेतलेला आहे. कुठल्याही क्षेत्रात वावरताना महिलांचे पाठबळ अत्यंत गरजेचे आहे, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी नमूद केले आहे.
भारताकडे आज मानाने बघतात : केंद्रीय मंत्री नाईक
दरम्यान, आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. विमान पायलट किंवा इतर मोठमोठ्या पदावर महिला आहेत. केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयातर्फे लवकरच गोव्यातील महिलांना जहाजावर काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आमच्या महिला कुठेच मागे राहता कामा नये. मोदींचे कार्य, भाजपचा विकास पाहून आज अनेक युवक-युवती भाजपकडे वळत आहेत. देशातील महिला सशक्त झाल्या तरच देश खऱ्या अर्थाने सशक्त होईल. सुरूवातीला भाजपकडे फक्त 2 खासदार होते आता 2024 मध्ये हाच आकडा 400 पार होणार आहे. जगभर आज भारताकडे मानाने पाहिले जात आहे. हे सर्व शक्य झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीमुळेच, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी या संमेलनावेळी बोलताना सांगितले.
मोदी हीच देशासाठी गॅरंटी : मुख्यमंत्री डॉ. सावंत
नारी शक्ती वंदन विधेयक आणून पंतप्रधान मोदी यांनी महिला विकासाची दारे खुली केली आहेत. अखंड भारताच स्वप्नदेखील मोदींमुळे पूर्ण होताना दिसत आहे. तसेच भारत आज तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश असून, विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर आहे. हे फक्त मोदी सरकारमुळे शक्य झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य कर्तृत्त्व जगभरात कौतुकास्पद बनत चालले आहे. येणाऱ्या लोकसभेत मोदी हीच देशासाठी गॅरंटी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.