अध्याय एकोणतिसावा
उद्धव भगवंताना म्हणाला, तुझ्या भक्तांना विघ्ने बाधत नाहीत ह्यात नवल काहीच नाही. तू भक्ताच्या प्रेमाला भुलून भक्ताच्या आधीन होतोस आणि त्याच्यासोबत राहतोस. तू जिथं असशील तिथं यायचं विघ्नं विचारसुद्धा करू शकत नाहीत. भक्तांच्या अधीन होऊन त्यांची हलकीसलकी कामे करताना तुला कोणतीही लाज वाटत नाही. तुला कुणाकडून कसलीही अपेक्षा नाही.
श्रीमंत आणि अब्रूदार भक्तांवर तुझे जेव्हढे प्रेम असते तेव्हढेच किंवा काकणभर अधिकच प्रेम तू गरीब अथवा निर्धन भक्तांवरही करतोस. तू भक्तकैवारी असल्याने भक्तांच्या अडचणीच्यावेळी धावून जाण्यात तर तुझा हात कोणीच धरू शकणार नाही. दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी बळीचा द्वारपाल झालास असा भक्ताधीन होऊन तू दिलेल्या वचनानुसार भक्तांशी वेळोवेळी वर्तन करतोस. इंद्र, चंद्र आणि महेंद्र, ब्रह्मा, बृहस्पती आणि शंकर असे देवांना पुज्य असलेले जे ईश्वर आहेत तेही तुझे दास आहेत. तुझ्या दर्शनासाठी सुरवरांची दाटी होते. जे तुझी आज्ञा मानत नाहीत त्यांना तू शासन करतोस. ह्यातून अगदी ब्रम्हादीक सुद्धा सुटत नाहीत मग इतरांची काय कथा? तुझ्या आज्ञेला प्रमाण मानून वायू नेमस्तपणे म्हणजे तू सांगितल्याबरहुकूम वहात असतो.
तसेच सूर्यही तुझ्या आज्ञेप्रमाणे नियमित प्रकाश देऊन माणसांचे जीवन सुसह्य करतो. तुझ्या आज्ञेला भिऊन समुद्र कधी त्याची मर्यादा उल्लंघत नाही. तसेच पाऊसकालही तुझ्या आज्ञेनुसार चालतो. तुझ्या आज्ञेची थोरवी अशी आहे की, स्वत: मृत्यू तुझा दास होतो. उद्धवाचे बोलणे भगवंत कौतुकाने ऐकत होते. ते म्हणाले, अरे उद्धवा, तू माझे एव्हढे वर्णन करतोयस खरं पण मी तर नंदाचा गुराखी आहे, उग्रसेनाचा सेवक आहे मग माझी एव्हढी थोरवी आली कुठून? त्यावर उद्धव म्हणाला देवा, तुमच्या एव्हढा वेड्याचे सोंग घेऊन वावरणारा सोंगाड्या मी अजून बघितला नाही. माझी एव्हढी थोरवी नसून मी सामान्य गुराखी आहे असे म्हणता तर मग काळाचा बिमोड करून गुरुपुत्र परत कसा आणलात? गोवर्धन पर्वत केवळ करंगळीवर तोलून धरत इंद्राला झालेल्या गर्वाचे हरण कसे केलेत? इतरांच्या गोष्टी कशासाठी बोलायच्या? प्रत्यक्ष विधात्याला म्हणजे ब्रह्मदेवाला वेड लावलेत आणि स्वत: गाई वासरे झालात. बाणासुराचा कैवार घेऊन प्रत्यक्ष देवांचे देव महादेव कोपिष्ट होऊन आले असता त्यांना तुम्ही क्षणभरातच जिंकलेत. प्रत्यक्ष नारायणाने तुमची भेट घेण्यासाठी ब्राह्मणाच्या मुलाचे रूप घेतले. तुम्ही तर भक्तांचे कैवारी आहात. त्यांच्यासाठी लीला करून तुम्ही निरनिराळे अवतार घेता आणि दीनांचा उद्धार करता. ऋषीकेशी तुमचा महिमा असा अगाध आहे.
आम्हाला ह्याच अवतारात त्याची निश्चितच प्रचीती आली आहे. आम्हाला तू एव्हढा जवळचा वाटतोस की, आम्ही तुला सहजपणे अरे जारे करतो. तू अनंत आणि अपार आहेस, विश्वाचा नियंता आहेस, ईश्वराचा ईश्वर आहेस. असं जरी असलं तरी भक्तांच्यावर मात्र तू कायमच करुणा करतोस. कशी ते आता सांगतो. येथे दया आणि करुणा येथील फरक लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. एखाद्या भिकाऱ्याची दया येऊन त्याला पैसे दिले जातात पण लगेच दुसरा भिकारी पुढे आला तर त्याला पैसे दिले जातीलच असे नाही पण तू करत असलेली करुणा मात्र प्रत्येक भक्तासाठी सारखीच असते. त्यात तुझ्याकडून कधीही भेदभाव घडत नाही.
म्हणून तू खरोखरच भक्त करुणाकर आहेस. तुला नमस्कार करायचं भाग्य देवानाही दुर्लभ असतं पण रामावतारात तू वानरानाही दर्शन दिलेस. तू कृपा करून बोलावेस म्हणून वेद तिष्ठत किती वेळ उभे असतात हे कुणी सांगू शकत नाही पण वानरांच्या कानात मात्र तू तुझे मनोगत अगदी मनापासून सांगितलेस. तुझे ज्ञान वेदशास्त्रानाही कळत नाही इतके अगाध आहे परंतु असं असलं तरी तू मात्र वानरांचा सल्ला घेत होतास आणि त्याप्रमाणे वागत होतास. ह्याला काय म्हणावे?
क्रमश: