बाजारात वर्दळ : मागणीत वाढ : दर स्थिर
प्रतिनिधी /बेळगाव
तिळगूळ घ्या, गोड बोला… अशा गोड शुभेच्छा देणारी मकरसंक्रांत अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे बाजारात तिळगूळ, तिळाचे लाडू आणि इतर साहित्य दाखल झाले आहे. विशेषत: रंगीबेरंगी तिळगुळाला मागणी वाढली आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे मकरसंक्रांत निर्बंधात साजरी झाली होती. मात्र, यंदा मकरसंक्रांत उत्साहात साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
नवीन वर्षातील पहिला सण उत्साहात साजरा करण्यासाठी बाजारात वर्दळ सुरू आहे. विशेषत: तिळगूळ, तिळाचे लाडू, तिळ भाकरी, गूळ पोळी यासह तिळाच्या पदार्थांना मागणी वाढू लागली आहे. गणपत गल्ली, काकतीवेस, खडेबाजार, रामदेव गल्ली, मेणसी गल्ली, पांगुळ गल्ली, समादेवी गल्ली आदी भागात तिळगुळाची विक्री सुरू झाली आहे. काही चौकांमध्ये त्यांची किरकोळ विक्री होत आहे.
सुवासिनी वाण देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत. लहान मुलांचे बोरस्नान करण्यासाठी चिरमुरे, वाटाणा, हरभरा, तिळगूळ, खोबरे, ऊस, काशी बोर आदी विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
यंदा संक्रांत होणार गोड
लहान मुलांसाठी विविध आकारांमध्ये लहान डबे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे बालचमूंकडून प्लास्टिकच्या लहान डब्यांची मागणी वाढू लागली आहे. बाजारात 48 ते 50 रुपये किलो दराने तिळगूळ विक्री होत आहे. मकरसंक्रांत जवळ आल्याने तिळगूळची मागणी वाढली आहे. महागाई वाढत असली तरी तिळगूळ दर स्थिर असलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांची संक्रांत गोड होणार आहे.