ओटवणे/ प्रतिनिधी –
सरकारमान्य रेशन धान्य दुकानावर विकल्या जाणाऱ्या वस्तूवरील कमिशन वाढवून मिळण्यासह इतर प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचे सातत्याने लक्ष वेधूनही अद्याप ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे देशभरातील संतप्त रेशन धान्य दुकानदारांनी सोमवारी प्रत्येक तालुका तहसिलदार कार्यालयावर आपल्या मागण्यांसाठी घोषणा देत धरणे आंदोलन छेडले. यावेळी भर धो धो पावसात जिल्ह्यातील धान्य दुकानदारांनी सर्व तहसिलदार कार्यालयावर धरणे आंदोलन छेडून आपल्या मागण्यांचे तहसिलदारांना निवेदन दिले.
तसेच धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबत येत्या आठ दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. त्यानंतरही याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास १८ जुलै रोजी मुंबईत आझाद मैदानावर राज्यस्तरीय धरणे आंदोलन छेडून मोर्चाद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच २ ऑगस्ट रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर रेशन परवानाधारक कर्मचारी व कुटुंबासह देशव्यापी धरणे आंदोलन छेडून संसदेला घेरावा घालण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी सावंतवाडी तालुका रेशन दुकानदार संघटनेने अध्यक्ष गणपत राणे, उपाध्यक्ष तन्वी परब, सचिव अमेय गावडे, खजिनदार अनिकेत रेडकर, सोमनाथ परब, संतोष गावडे, संजय मळीक, शिवा लाड, सुरेश शेटवे, संगीता कोकरे अर्जुन सावंत, मनिषा परब, संदीप गावडे, श्री ठाकूर आदी सावंतवाडी तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार उपस्थित होते.