लोणावळा : वादळी वारा आणि गारपीटीसह मावळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती व पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले आहे. तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, अशा सूचना मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी महसुल विभागाला दिल्या आहेत.
मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी रविवारी गारपीटीसह अवकाळी पाऊस झाला. दोन दिवसांपूर्वी देखील मावळात सर्वत्र अशाच पद्धतीने विजांच्या कडकडाटासह व वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला होता. या पावसामुळे मावळ तालुक्यातील शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अंदर मावळ भागात वादळी वाऱ्यांमुळे अनेक पॉलिहाऊसचे शेड उडून गेले आहेत. पवन मावळात मोठय़ा प्रमाणात गारपीट झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. जनावरांसाठी साठवलेला चारा भिजून खराब झाला आहे. शेतामधील उभी पिके व भाजीपाला खराब झाला आहे. शासनाने या नुकसानीचे पंचनामे करत जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना करत या नुकसानीमधून सावरावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्ग करत आहे.